कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पदयात्रा काढली.
तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तृणमूल कॉंग्रेसमधील आमचे काही आमदार भाजपाच्या गोटात शिरले आहे, तरी त्याचा तृणमूलवर काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही. भाजपा आमदारांना खरेदी करू शकते पण तृणमूल कॉंग्रेसला खरेदी करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवा, असे ओपन चॅलेंज ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपाला दिले आहे.
प. बांलमधील जनताही तृणमूलसोबत असल्याचे ममता यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या पदयात्रेत प्रंचड संख्येने जनता सहभागी झाली होती.
भाजपाने प. बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासूनच शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. भाजपाचे अध्यक्ष नड्डा आणि माजी अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प. बंगालचा दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्यात त्यांनी तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक आरोप केले होते. या पदयात्रेत ममता यांनी त्यांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.