नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना येत्या 30 डिसेंबर रोजी चर्चेला बोलावले आहे. या आधी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केंद्राचे चर्चेचे निमंत्रण स्वीकारून आम्ही 29 डिसेंबरला चर्चेला येऊ असे सरकारला कळवले होते. पण सरकारने आता त्यांना 30 डिसेंबरची तारीख दिली आहे.
कृषी खात्याचे सचिव संजय आगरवाल यांनी या प्रतिनिधींना 30 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता विज्ञान भवन येथे चर्चेसाठी पाचारण केले आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये या आधी चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यात कोणताहीं तोडगा निघू शकला नव्हता.
आता पुन्हा ही चर्चेची सहावी फेरी होत असून यातून काही तरी तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी गेले महिनाभर धरणे धरून बसले असून केंद्राने संमत केलेले तिन्ही कृषी विषयक कायदे रद्द करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे तर हे कायदे रद्द केले जाणार नाहीत अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी आता कशी फुटणार हाच महत्वाचा प्रश्न आहे.