मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बदली कर्णधार अजिंक्य रहाणेने नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, तरीही मी त्याचे कौतुक करणार नाही. त्याचे कौतुक केले तर लगेच मी माझ्या मुंबईच्याच खेळाडूंचे कौतुक करतो, असा आरोप माझ्यावर केला जाईल. कारण असे अनुभव मला यापूर्वीही सातत्याने आले आहेत, असा खुलासा गावसकर यांनी केला आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 195 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालच्या मोबदल्यात 1 बाद 36 पर्यंत मजल मारली.
कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपल्या नेतृत्व कौशल्याची झलक दाखवत गोलंदाजीत बदल, फिल्डींग प्लेसमेंट करत कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी दिली नाही. अजिंक्यचे कौतुक करून तो खूप चांगला कर्णधार आहे असे मत व्यक्त केले तर मी मुंबईच्या खेळाडूंनाच पाठींबा देतो असा आरोप होईल, असेही ते म्हणाले.