नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या रणधुमाळीसाठीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. ( vidhansabha election date )
संबंधित राज्यांमधील विधानसभांची मुदत पुढील वर्षी मे आणि जूनमध्ये समाप्त होणार आहे. त्यामुळे त्या राज्यांत पुढील वर्षीच्या एप्रिल आणि मेमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पुढील आठवड्यात आयोगाचे वरिष्ठ अधिकारी बंगाल आणि तामीळनाडूचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्या दौऱ्यात ते संबंधित राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. आगामी निवडणुकांमुळे केवळ त्याराज्यांतीलच नव्हे; तर संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. ( vidhansabha election date )
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकारण आतापासूनच तापले आहे. त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला पर्याय ठरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बंगालमध्ये डावे पक्ष आणि कॉंग्रेसमधील आघाडीही त्या पक्षांपुढे मोठे आव्हान उभी करू शकते.
आसाममध्ये सत्तारूढ भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढत होईल. तर केरळच्या सत्तेसाठी पुन्हा सत्तारूढ डावे पक्ष आणि कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. तामीळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुक आणि प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक हे पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा पुन्हा कस लागेल. मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत राजकीय पडद्यावर अवतरणार असल्याने तामीळनाडूतील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. ( vidhansabha election date )
रजनीकांत नववर्षात राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्याशिवाय, आणखी एक सुपरस्टार कमल हासन यांचा पक्षही रिंगणात असेल.