सदाशिवराव आणि रुक्मिणीबाई विदर्भातील एक वृद्ध दाम्पत्य. वयाची सत्तरी ओलांडली असली तरी स्वतःची कामे स्वतः करण्याची उमेद. ऐन तारुण्यात काबाडकष्ट करून त्यांनी शेती सांभाळली होती. रक्ताचे पाणी करून त्यांनी कापसाच्या बोंडातून जणू सोनेच पिकविले होते. नंतर त्यांचा विवाह रुक्मिणीबाई यांच्याशी झाला. शेतकरी कुटुंबातील असल्याने रुक्मिणीबाईंनी सदाशिवरावांना साथ देत शेती फुलविली. त्यांना नितीन आणि निखिल नावाची दोन मुले झाली. आज नितीन व निखिल दोघेही शासकीय सेवेत मोठ्या पदावर. हे वृद्ध दाम्पत्यही शहरात मुलांसोबत राहायला होते. दोघेही मुले विभक्त राहात होते. दोघांचाही संसार सुखात सुरू होता. मात्र, सासू-सासऱ्यांबाबत दोन्ही सुनांना फारसे काही देणेघेणे नव्हते. मुलेही आई-वडिलांकडे फारसे लक्ष देत नव्हती.
सध्या सदाशिवराव व त्यांच्या पत्नी त्यांच्या धाकट्या मुलाकडे नितीनकडे राहायला होत्या. अधूनमधून त्या निखिलच्याही घरी जाऊन राहात असत. नितीनला श्रावण नावाचा एक पाच वर्षांचा गोंडस मुलगा होता. श्रावणला मात्र आजी आजोबांचा चांगलाच लळा होता.
एके दिवशी सासू-सुनेमध्ये किरकोळ वाद झाला; परंतु नंतर तो वाद इतका विकोपाला गेला की आई-वडिलांपैकी एकाला थोरल्या मुलाकडे राहायला पाठविण्याचे ठरले. ज्याप्रमाणे संपत्तीचा समान हिस्सा वाटप झाला होता त्याप्रमाणे आता आई-वडिलांचे वाटप करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला जात होता.
घरातील वातावरण तणावपूर्ण होते. सदाशिवराव व रुक्मिणीबाई मात्र या निर्णयाने पूर्ण खचले होते. श्रावणला चांगलेच कळत होते परंतु लहान असल्याने केवळ पाहण्याशिवाय तो काहीही करू शकत नव्हता.
अखेर तो दिवस उजाडला सदाशिवरावांना थोरल्याकडे राहायला जावे लागणार होते. जुन्या पेटीत सदाशिवराव आपले सर्व कपडे आणि साहित्य भरत होते. रुक्मिणीबाईही त्यांना थरथरत्या हाताने आणि भरलेल्या डोळ्यांनी मदत करीत होत्या.
तेवढ्यात श्रावण आपल्या वडिलांना म्हणाला, “”पप्पा आजोबांना नका ना पाठवू तिकडे.”
नितीन समजूत काढत म्हणाला, “”बाळा त्यांना काकाच्या घरी जायचे आहे तिकडे त्यांची मुलेही आजोबांची वाट पाहात आहेत.”
श्रावण पुन्हा म्हणाला, “”पप्पा आजोबांना सांगा नका जाऊ म्हणून”
नितीन व त्याची बायको मात्र श्रावणला समजावत होते. श्रावण थोडावेळ शांत बसला व काहीवेळाने वडिलांना म्हणाला, “”पप्पा, आजोबा गेले की मला एक भाऊ आणा ना.”
नितीन आपल्या मुलाला म्हणाला, “”अच्छा तुझ्यासोबत खेळायला का?”
श्रावण लगेच बोलला, “”खेळायला नाही!”
नितीनने कुतूहलाने विचारले, “”मग कशासाठी हवाय तुला भाऊ?”
त्यावर क्षणाचाही विलंब न करता श्रावण बोलला, “”उद्या मी मोठा झालो की तुम्ही म्हातारे होणार आणि मग तुमच्या दोघांपैकी एकाला मी माझ्याकडे ठेवीन पण एकाला नको का दुसरीकडे पाठवायला!”
घरात क्षणभर शांतता पसरली. छोट्याशा श्रावणाच्या या उत्तराने नितीन आणि त्याच्या पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. पुढे आपली चूक नितीन आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात आली. एका पाच वर्षांच्या मुलाने त्याच्या आई-वडिलांना चांगलाच धडा दिला होता. वरील घटनेतून एक गोष्ट मात्र नक्कीच उमगते, ती म्हणजे आपण जे पेराल तेच उगवते. मग ती कोणतीही गोष्ट असो. निसर्गाचा नियम आहे जे बीज आपण लावू त्याच गुणधर्माचे रोपटे उगवणार.
मानवी स्वभावाबाबत बोलायचे झाल्यास आपल्या कर्माचे, विचाराचे आणि वर्तनाचे बीज हे आपल्याला उचित परतफेड करीत असते. आपण जीवनात नेहमी चांगल्याच गोष्टी पेरायला शिकल्या पाहिजेत. संत तुकाराम महाराजांनीही आपल्या अभंगातून याबाबत अतिशय समर्पक उदाहरण दिले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात- शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी। बीज चांगले असेल तरच फळेही रसाळ आणि गोड येतील.
तुम्ही राग, द्वेष, मत्सर, तणाव, विकृती यासारख्या नकारात्मक गोष्टी घडविल्या तर तुमच्या वाट्याला नक्कीच दु:ख येणार. याउलट तुम्ही जर जीवनात प्रेम, वात्सल्य, करुणा यासारख्या सकारात्मक गोष्टी पेरल्या तर समृद्ध जीवनाचे दरवाजे हे नेहमी तुमच्यासाठी खुले असतील.
लक्षात ठेवा आपल्या जीवनात आपण नेमके काय घडवणार आहोत, याचे उत्तर आपण आज काय पेरणार आहोत, यातच दडलेले आहे.
व्यक्तिमत्त्व
– सागर ननावरे