गोष्ट थोडी जुनीच अंदाजे अकरा वर्षांपूर्वीची…माझी पत्नी मोनिका हिचं पहिलं डोहाळं जेवण काही कारणास्तव होऊ शकले नाही, म्हणून तिच्या दुसऱ्या गरोदरपणात तिची हौस पुरी करण्यासाठी आमची सामाईक मैत्रीण शिल्पा लाहोटी हिने डोहाळं जेवण ठेवले. तिने याच्या आयोजनाची जय्यत तयारी केली, आपली ऊर्जा, मेहनत, खर्च आणि सगळ्यात समन्वय साधत एक आटोपशीर पण उत्तम असा डोहाळं जेवणाचा कार्यक्रम यथासांग पार पाडला. तिच्या या निरागस व निरपेक्ष कृतीने आम्ही उभयंता भारावून गेलो होतो. काही ऋणात कायम राहण्यात सुख असते त्या पैकी हा एक, पण काही आगळ्या पद्धतीने परतफेड करावी अशी आशाही मनी लुकलुकत होती. मी शिल्पाने मोनिकासाठी केलेल्या डोहाळं जेवण व तिच्या मागील तिची भावना, उदात्तपणा इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून लेख लिहून एका वृत्तपत्राकडे पाठविण्याचे ठरविले.
या पूर्वी मी कधीही काहीही लिहले नव्हते. वर्तमानपत्रात दिलेले लिखाण प्रसिद्ध व्हावे यासाठी विषयाची कशी मांडणी करावी याचे ज्ञानही नव्हते. मग अशा आशयाचे वेगवेगळे लेख वाचून काढले, काही शब्दांचे चौर्य कर्मही केले आणि अंदाजे नऊशे शब्दांत डोहाळं जेवणबद्दलचा लेख लिहून तयार केला. तो पाठवून तर दिला, पण तो छापला जाईल की नाही याबद्दल मनात शंकाच होती, पण वाट पाहण्यापलीकडे हातातही काहीच नव्हते.
अंदाजे दोन महिन्यांनंतर पूर्ण पानभर असा तो लेख छापून आला. हा माझा पहिला वहिला लेख. मला जाणवले की ज्याअर्थी लेख छापून आला त्याअर्थी आपण बऱ्यापैकी लिहू शकतो, फक्त त्यासाठी थोडं अधिक लक्ष द्यायला हवे. मग मी वाचनाकडे मोर्चा वळवला. शब्द संपदा वाढविण्यासाठी प्रयत्नशील झालो. महेश नवमी समोरच होती, माहेश्वरी समाजात महेश नवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे औचित्य साधत माहेश्वरी समाजाबद्दलचा लेख दिला, तोही छापून आला.
दुसऱ्या वेळेचं यशच; तुमचं पहिलं यश अपघाताने मिळालं नव्हतं हे सिद्ध करतं आणि पर्यायाने आपली जबाबदारीही वाढवतं या उक्तीचे अनुकरण करत मी लेखनाबद्दल गांभीर्याने विचार करू लागलो. ग्रंथालयाचे सभासदत्व घेतले, अवांतर वाचन वाढवले. परिसंवाद, चर्चासत्र, सभा, व्याख्यानांना उपस्थित राहू लागलो. अवतीभोवती घडणाऱ्या घटना व त्यांचं केलेले निरीक्षण हे लेखनास खाद्य पुरवण्याचे काम करत असतं. या साऱ्या अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या विषयांवर लिखाण सुरू केलं आणि ते पुढं विविध वृत्तपत्रांत छापलं जाऊ लागलं. आपण लिहलेले सारेच छापून येतं असं होत नसतं; पण आपल्याला यानिमित्त व्यक्त होता येतं, आपण रिते होतो असा वैयक्तिक फायदा तर नक्कीच होतो. आज जाणवतं की माझा तो पहिला लेख छापून आला नसता तर माझ्यातला हा सुप्त गुण तसाच राहून गेला असता. यासाठी साऱ्या पत्रकार मंडळींचे तसेच वर्तमानपत्रांचे मानावे तेवढे आभार थोडेच.
हुनर तो सब में होता हैं,
किसीका छिप जाता है, तो किसीका छप जाता हैं।
परिघ
– सत्येंद्र राठी