पुणे – “मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना टार्गेट करणे चुकीचे असून, समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली,’ असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गायकवाड बोलत होते.
“मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाचे (ईडब्लूएस) लाभ देण्यात यावेत,’ अशी गायकवाड यांची मागणी आहे.
“मराठा समाजाच्या “एसईबीसी’ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने, ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाज पात्र आहे. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले नसल्याने तहसीलदार, प्रांत अधिकारी मराठा समाजातील युवक-युवतींना “ईडब्लूएस’ प्रमाणपत्र देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाज विद्यार्थ्यांना खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेशास परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने आठ दिवसांत मराठा विद्यार्थ्यांना “ईडब्लूएस’ प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.