नवी दिल्ली – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्यांचेच लक्ष करोनाची लस कधी येणार, याकडे लागले आहे. मात्र देशातील करोनाची साखळी तोडण्यात यश आले, तर प्रत्येक नागरिकाला लस देण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराम भार्गव यांनी आज दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्वाची माहिती दिली.
देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी किती वेळ लागेल याविषयी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देशभरात लसीकरण करण्यात येईल, असे सरकारने कधीही म्हटलेले नाही. त्यामुळे आपण केवळ वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावरच अशा वैज्ञानिक विषयांवर चर्चा करायला हवी. असे भूषण म्हणाले.