पुणे – राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) केलेल्या पाहणीनुसार डिसेंबर ते मार्चदरम्यान वाघांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते. या काळात स्थानिक नागरिकांचा जंगल परिसरात वाढणारा वावर हे यामागील प्रमुख कारण असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.
“एनटीसीए’तर्फे नुकताच 2012 ते 2019 या कालावधीत वाघांच्या मृत्यूबाबतच्या पाहणीचा अहवाल प्रकाशित झाला. यात देशभरातील तसेच राज्यांमधील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण, त्याची कारणे, वर्षानुसार मृत्यूदर, ठिकाण अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. अहवालात कोणत्या महिन्यात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
“एनटीसीए’च्या पाहणीनुसार, राज्यातील विविध व्याघ्रप्रकल्पांमध्ये डिसेंबर ते मार्चदरम्यान सर्वाधिक वाघांच्या मृत्यूच्या घटना घडतात. 2012 ते 2019 या काळात सर्वाधिक घटना मध्य प्रदेश येथे घडल्या असून, त्याची संख्या 173 आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 125 वाघांच्या मृत्यू नोंद झाली. तर, सर्वाधिक व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांच्या अंतर्गत भागात असल्याचेही पाहणीत समोर आले.
अभ्यासकांच्या मते, आपल्याकडे जून ते सप्टेंबरदरम्यान व्याघ्रप्रकल्पांमध्ये पर्यटक तसेच अन्य नागरिकांना प्रवेश बंदी असते. तर, त्यानंतर खुली केली जातात. त्यामुळेच स्थानिक नागरिक अथवा अन्य लोकांना संरक्षित क्षेत्रात प्रवेश करता येतो. त्यातून वाघांची शिकार, विषप्रयोग, अपघात यासारख्या घटना घडतात. अनेकदा नैसर्गिक कारणांमुळेही मृत्यू होतात. मात्र शिकार, विषप्रयोग यासारख्या घटना रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महिना आणि वाघांच्या मृत्यूच्या घटना
महिना संख्या
डिसेंबर 85, जानेवारी 86, फेब्रुवारी 62, मार्च 85, एप्रिल 76, मे 80, जून 53,
जुलै 49, ऑगस्ट 40, सप्टेंबर 35, ऑक्टोबर 38, नोव्हेंबर 62