पुणेकरांच्या आरोग्यासाठी आता पंचवार्षिक धोरण आखून गरजूंना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ही एक चांगली घडामोड मानावी लागेल. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जात आहे. पण त्याच्या खर्चाचा नेमका ताळमेळ राखला जात नसल्याने आणि कोणत्या कारणासाठी हे पैसे खर्च करावेत यासाठीचे नेमके धोरणच नसल्याने हा खर्च कारणी लागत नव्हता.
आता निश्चित धोरण ठरवून हा निधी खर्च करण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे शहराची नेमकी आरोग्य गरज लक्षात घेऊन आवश्यक तेथे पुरेसे आर्थिक नियोजन केले जाणार आहे. पुण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्यात आरोग्य समस्या ही एक महत्त्वाची आहे. शहरातील काही सामाजिक संस्था या समस्येवर काम करीत असल्या तरी त्यांना आरोग्य नियोजन कार्यात फारसा वाव दिला जात नाही. त्यामुळे शहराचे नेमके दुखणे या लोकांना माहिती असूनही त्यांना त्यावर प्रभावीपणे काम करण्यास बरीच अडचण येत असे. महापालिकेचे पुण्यात बरेच दवाखाने आहेत. पण त्याचा सारा कारभार अत्यंत ढिसाळ स्वरूपाचा असल्याचा अनुभव आपण घेतो आहोत. परंतु काही बाबतीत महापालिका दवाखान्यांतूनसुद्धा परिणामकारक आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याचेही अनुभव आहेत. पण हे अनुभव पुणेकरांना अधिक व्यापक स्वरूपात मिळणे गरजेचे आहे.
आज जवळपास शहरातील सर्वच वॉर्डातल्या नागरिकांना त्यांच्या अगदी जवळच महापालिका दवाखान्यांची सोय उपलब्ध आहे. हे दवाखाने कार्यक्षमपणे चालवले गेले, तर पुणेकरांची एक मोठी गरज भागू शकणार आहे. कारण वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत पुणे हे अत्यंत महागडे शहर मानले जाते. पुण्यात आजारी पडणे आज कोणालाच परवडणारे नाही. खासगी दवाखाने किंवा हॉस्पिटल आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली बाब मानली गेली आहे. रुग्णांची अशा खासगी हॉस्पिटलमध्ये कशी लूट चालते याच्या हकिकती आता सोशल मीडियातूनही वाचायला मिळू लागल्या आहेत. बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबीयांनाही पुण्यातील खासगी रुग्णालयांची सेवा परवडेनाशी झाली आहे. आयुष्यभर कमवायचं आणि आयुष्याच्या शेवटी हॉस्पिटल खर्चावर गमवायचं, अशी गत सध्या होऊ पाहत आहे. सामान्य माणूस हॉस्पिटल खर्चामुळे जेरीला आला आहे. त्यामुळे त्याला अशा महापालिका स्तरावरच्या खात्रीशीर आणि अत्यंत माफक दरातील वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे बनले आहे. त्यात आता महापालिकेने लक्ष घालायचे ठरवले आहे, ही खरोखरच एक चांगली बाब मानावी लागेल.
वैद्यकीय सुविधांसाठीच्या पायाभूत सोयी महापालिकेकडे उपलब्ध आहेतच, फक्त त्याचा परिणामकारक वापर झाला तरी अनेकांचे काम होऊ शकणार आहे. महापालिकेचे अनेक दवाखाने सध्या पुण्यात अस्तित्वात आहेत. तेथील यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित होणे ही तातडीची गरज आहे. अनेक नागरिकांना वारंवार आरोग्य चाचण्या करून घ्याव्या लागतात. त्यात रक्त, लघवी तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे वगैरे सारख्या चाचण्या काहींना सतत करून घ्याव्या लागत आहेत. शहरातील खासगी लॅबमधून या चाचण्या करून घेणे खर्चिक ठरत आहे. या चाचण्या आणि तपासण्यांची सोय महापालिका दवाखान्यांमध्येच उपलब्ध करून दिली, तर नागरिकांना परवडणारी आहे. सध्याच्या करोनाच्या काळात महापालिका व शासन यंत्रणेने रूग्णांना अत्यंत तत्परतेने चांगली सेवा दिल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत असतात. सुरुवातीला सरकारी उपचार केंद्रांमध्ये नाईलाजानेच दाखल झालेल्या रूग्णांना तेथील चांगल्या सेवांचा सुखद अनुभव मिळाला. उत्तम दर्जाच्या जेवणासह मोफत औषधोपचाराची सोय हजारो रूग्णांसाठी करून दिली गेली. या कामी काही दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांचीही मोठी मदत झाली आहे. सगळ्यांच्याच समन्वयाने करोना रुग्णांवरील उपचाराचे बऱ्यापैकी समाधानकारक काम पुण्यात होऊ शकले.
राज्यातील अन्य शहरांच्या मानाने पुण्यातील रुग्ण संख्या मोठी होती. त्यामुळे या यंत्रणेवर बराच ताण आला; पण समन्वयाने ते काम मार्गी लागले आणि शेकडो करोना बाधित खडखडीत बरे होऊन बिनखर्चात घरी गेले. लोकांना सर्वच आरोग्य सेवांच्या बाबतीत हाच अनुभव कायम स्वरूपी देता आला, तर त्या सारखे दुसरे समाधान नसेल. त्यामुळे पंचवार्षिक धोरण आखून महापालिकेची यंत्रणा आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम करणार असेल, तर त्या योजनेला सगळ्यांनीच सहकार्य देण्याची गरज आहे. शहराची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जात असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यासाठी खासगी वैद्यकीय तज्ज्ञांचीही मदत घेतली जात असून सर्वच पुणेकरांना माफक दरात उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांना शुभेच्छाच द्यायला हव्यात. करोना काळामुळे संपूर्ण जगालाच सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व पटले आहे.
आपल्याकडे करोनाचे रूग्ण वाढल्यानंतर आरोग्य सेवेतील सगळ्याच बाबतीतला अपुरेपणा चांगलाच चव्हाट्यावर आला होता. त्या कमतरता दूर करताना सरकारी यंत्रणेची दमछाक झाली. अनेक ठिकाणी वाढीव रुग्णांना सामावून घेण्यासाठी आयत्यावेळची तात्पुरती उपचार केंद्रेही उभारावी लागली आहेत. त्या केंद्रांतील यंत्रणा उभारण्यासाठीही सरकारी यंत्रणांची मोठी तारांबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि साथीच्या रोगावरील आपत्कालिन स्थितीला तोंड देण्यासाठीची सज्जता अशा साऱ्याच गोष्टींचा विचार करून सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
चांगले काम करण्याची मनापासून इच्छा असेल तर महापालिका किंवा सरकारी पातळीवरसुद्धा खूप चांगले आणि लोकोपयोगी काम करता येते याचा अनुभव जसा लोकांनी करोनाच्या बाबतीत पुण्यात घेतला तसाच अन्य आरोग्य समस्यांच्या संबंधातील चांगला अनुभव दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या उपाययोजनांतूनही तेथील नागरिकांना मिळाला आहे.
सार्वजनिक स्वरूपातील सर्वात उत्तम आरोग्य सुविधा दिल्ली राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे, त्याचे वेळोवेळी अनेक स्तरांवर कौतुक झाले आहे. पुण्यातही अशीच कौतुकास्पद सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने महापालिकेने जे प्रयत्न हाती घेतले आहेत त्यात त्यांना यश येवो आणि त्यातून चांगले काम उभे राहो, हीच शुभेच्छा.