कॅनबेरा – सलग दोन सामन्यांसह मालिका गमावलेल्या भारतीय संघासमोर आज होत असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकत भारतीय संघाला व्हाइटवॉश देण्यासाठी ते सज्ज बनले आहेत.
जवळपास आठ महिन्यांच्या खंडानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असून या पहिल्याच परदेश दौऱ्यात भारतीय संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे.
या वर्षाच्या प्रारंभी भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता, त्यातही भारतीय संघाला टी-20 व दोन कसोटी मालिकेत व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार होता. त्यातील धर्मशालातील पहिला सामना पावसाने वाया गेला होता व नंतरचे दोन्ही एकदिवसीय सामने करोनाचा धोका वाढल्यामुळे रद्द करण्यात आले होते. त्यानंतर जगभरात करोनाचा धोका वाढल्यामुळे क्रिकेट ठप्प झाले होते.
आता जवळपास आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा सामने व स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू अमिरातीत आयपीएल स्पर्धेत खेळल्याने त्यांना सराव मिळाला होता तरीही भारतीय संघाला या पहिल्याच मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला या मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमवावे लागले आहेत. आता व्हाईटवॉश टाळण्यासाठी आज होत असलेला अखेरचा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. या दोन्ही सामन्यांत यजमान ऑस्ट्रेलियाने तीनशेपेक्षाही जास्त धावा केल्या होत्या.
पहिला सामना 66 धावांनी तर दुसरा सामना 51 धावांनी जिंकत त्यांनी वर्चस्व राखले. अर्थात, भारतीय संघ पराभूत झाला असला तरीही दोन्ही सामन्यात भारतानेही त्रिशतकी धावा केल्या होत्या. मात्र, या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या मयंक आग्रवाल, श्रेयस अय्यर या फलंदाजांना तसेच नवदीप सैनीसारख्या नवोदित गोलंदाजांना अनुभव कमी पडल्याने सरस कामगिरी करता आलेली नाही.
सैनी होतकरू गोलंदाज असला तरीही त्याचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजांशी होत असल्याने त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आग्रवाल व अय्यर यांनी दोन्ही लढतीत चांगल्या धावा केल्या. मात्र, त्यांनी अनावश्यक आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट बहाल केल्या. इथेच त्यांचा संयम कमी पडला.जर त्यांनी विनाकारण धोका न पत्करता फलंदाजी केली असती तर कर्णधार कोहलीवरील दडपण दूर झाले असते व मालिकेचा निकालही वेगळा लागला असता.
ऑस्ट्रेलियाने फलंदाजी व क्षेत्ररक्षणासह गोलंदाजीतही भारतावर मात केली आहे. भारताच्या प्रमुख गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळेच भारताला अद्याप यश मिळवता आलेले नाही. जसप्रीत बुमराह, महंमद शमी यांच्यासह लेगस्पीनर यजुवेंद्र चहल यालाही प्रभाव पाडता आलेला नाही. आजच्या सामन्यात संघात डावखुरा फिरकी गोलंदाज व अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यासह वॉशिंग्टन सुंदर याला देखील स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
बुमराह व शमीकडून अपेक्षा
भारतीय संघाचे महंमद शमी व जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे कर्णधार कोहलीच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता आजच्या सामन्यात त्यांनी आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी केली तरच आजच्या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता निर्माण होणार आहे. मात्र, त्यासाठी या दोन्ही गोलंदाजांनी आपल्यावरील अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत.