परभणी – पुढील दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. दानवे म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तीन वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला.
नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीत घेऊन भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे. गेल्या काही वर्षात आमदाराने एकही प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला नाही, असे दानवे म्हणाले.
कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. विधानसभा-लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळाले पाहिजे, असेही आवाहन रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले.