नगर -शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचेच काम पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. बाळासाहेबांनी अनेकांना उभे करण्याचे काम केले. मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शिवसैनिक ताठ मानेने उभा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या स्मृती जनमाणसाच्या मनात कायम राहतील, असे प्रतिपादन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, मदन आढाव, दत्ता कावरे, सचिन शिंदे, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, सुरेश तिवारी, अभिषेक भोसले, अशोक दहिफळे, सुमित धेंड, नरेश भालेराव, पप्पू भाले, अमित लढ्ढा, विठ्ठल कोतकर, अक्षय नागापुरे, प्रणिल शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल आदी उपस्थित होते.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन हे अतिशय संघर्षमय होते. त्यांनी जीवनात मराठी माणूस आणि शिवसैनिक यांच्यासाठी आपले आयुष्य वेचले. समाजकार्याला प्राधान्य देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांची शिकवण प्रत्येकांने आपल्या आचरणात आणून सर्वसामान्यांसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे आदिंनी आपल्या मनोगतातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.