नगर -करोना महामारीमुळे राज्यात सुरु असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारने सर्वकाही सुरु केले. मात्र, सर्व मंदिरे गेल्या 8 महिन्यांपासून बंदच ठेवली. सर्व भाविकांचा भावनांचा विचार करत भाजप व दीनदयाळ परिवाराच्या वतीने जून महिन्यापासून मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलनेही केली. मात्र, सरकारला जाग आली नाही. आई तुळजाभवानी मातेनीच सरकारला सद्बुद्धी दिल्याने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरे पुन्हा उघडण्यात आली आहेत.
उशिरा का होईना सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, सर्व भाविकांच्या वतीने मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, असे प्रतिपादन दीनदयाळ परिवाराचे संस्थापक व भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.
तुळजाभवानी मातेचा जयजयकार करत, फटाके फोडून, शंख व घंटेच्या निनादात गौरीशंकर मित्रमंडळाच्या तुळजाभवानी मातेचे मंदिर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. यावेळी भाविकांच्या वतीने ज्येष्ठ नेते वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी सदाभाऊ शिंदे, मुकुंद वाळके, बाळासाहेब खताडे, आदिनाथ गिरमे, रवी दंडी, मंडळाच्या अध्यक्षा आरती आढाव, स्वाती शिंदे, संदीप शिंदे, मनीष लोढा, सागर शिंदे आदींसह भाविक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.