मुंबई – भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले तेलगू कवी-लेखक वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रुग्णालयाच्या नियमानुसार वरवरा राव यांना भेटण्यास त्यांच्या पत्नी हेमलता यांना परवानगी देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
राव हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात राव यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी धाव घेतली होती. न्या एस. एस शिंदे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना रुग्णालयातून सोडता येणार नाही.
मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी तळोजा कारागृहाच्या वैद्यकीय कक्षात राव यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात येत असल्याचे मान्य केले. राव यांच्यावर जुलै महिन्यात नानावटी रुग्णालयात करोनाचे उपचार करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असे आदेश खंडपीठाने दिले.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी राव यांच्या पत्नी हेमलता यांची बाजू कोर्टात मांडली. राव यांना स्मृतीभ्रशांचा त्रास होत आहे. त्यांना मुत्रपिंडाचा संसर्ग झाला आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत असून योग्य वैद्यकीय काळजी न घेतल्यास त्यांचा जीव जावू शकतो आणि ही कस्टोडीअल डेथची केस बनेल, असा युक्तीवाद जयसिंग यांनी केला. प्रत्युत्तरादाखल सरकारी वकिलांनी राव यांची प्रकृती खालावलेली असली तरीही डॉक्टर त्यांची काळजी घेत असल्याचे सांगितले.
कारागृहात बेशुध्द पडल्याने राव यांना प्रथमत: जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्यासाठी याचिका न्यायलयात दाखल असल्याने त्यांना पूर्ण बरे होण्याआधीच कारागृहात हलवण्यात आले. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात आला, याकडे जयसिंह यांनी लक्ष वेधले.
जुलै महिन्यातही त्यांना नानावटी रुग्णालयातून हलवताना कुटुंबीय किंवा न्यायलयाला कळवण्यात आले नाही. त्यांच्या डिस्चार्ज रीपोर्टवर त्यांची वैद्यकीय अवस्था नोंदवण्यात आलेली नाही. राव हे अंथरूणाला खिळलेले आहेत. त्यांच्या आवश्यक चाचण्या घेण्याएवढी कारागृहाच्या वैद्यकीय कक्षाची सज्जता नाही, याकडेही जयसिंह यांनी लक्ष वेधले.