पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा साडेतीन टीएमसी इतका जादा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा शहराचा पिण्याच्या, तर ग्रामीण भागासाठी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 28.38 टीएमसी म्हणजे 98 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात किती पाणीसाठा उपलब्ध आहे. यावरून पाणीवाटपाचे नियोजन ठरते. दरम्यान, प्रकल्पातील खडकवासला धरणात 1.88 टीएमसी, पानशेतमध्ये 10.65 टीएमसी, वरसगावमध्ये 12.82 टीएमसी आणि टेमघरमध्ये 3 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी चारही धरणात मिळून 24.75 टीएमसी इतका पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण अधिक आहे.