नगर – मा. खा. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 संचालकांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत 98.90 टक्के मतदान झाले. मतदान घडवून आणण्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदारांना आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी केली होती.
या निवडणुकीत पंधरा वर्षापासून सत्तेत असणारे कर्डिले कोतकर पुन्हा बाजी मारणार की महाविकास आघाडी परिवर्तन घडविणार हे उद्या (दि. 29) निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. मतमोजणी नगर कल्याण रोडवरील अमरज्योत मंगल कार्यालयात सकाळी 8 वाजता सुरु होणार असून तालुक्यातील जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांच्या नजरा निकालाकडे तर उमेदवारांसह त्यांच्या नेत्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.
बाजार समितीसाठी झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे. सोसायटी- 1378, ग्रामपंचायत- 1 हजार, हमाल मापाडी- 279 असे 98.80 टक्के मतदान झाले. नगर शहरातील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयात सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान घेण्यात आले. यासाठी सुरुवातीपासूनच प्रशासनाने जय्यत तयारी केली.
दोन्ही गट भिडल्याने तणाव
सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाची एक बस मतदारांना घेऊन मतदान केंद्राच्या गेटपर्यंत आल्याने त्यास महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले होते. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.