– माधव विद्वांस
मराठी आणि संस्कृतचे अभ्यासक, व्याख्याते, प्राध्यापक, लेखक अरविंद गंगाधर मंगरूळकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील किस्मयू बेटावर 29 एप्रिल 1909 रोजी झाला. तेथे त्यांचे वडील काडेपेटीचा व्यवसाय करीत असत. मातृभूमीपासून दूर असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले व ते पोरके झाले. त्यावेळी ते फक्त दहा वर्षांचे होते. त्यामुळे त्यांना सोलापूरच्या मामाने आधार दिला. कुशाग्र बुद्धीच्या अरविंदाने जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती, भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती तसेच नेसवाडिया सुवर्णपदक प्राप्त केले व आपल्या आवडीच्या संस्कृत आणि प्राकृत (मराठी) या दोन विषयांत एमए झाले.
त्यानंतर पुणे येथील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून अध्यापन कार्यास सुरुवात केली. कालांतराने मंगरूळकर पुणे येथेच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात संस्कृत-मराठीचे प्राध्यापक झाले. तेथे ते विभाग-प्रमुखही झाले. संस्कृत आणि मराठी साहित्याचा व्यासंग मोठा होता त्याबरोबर साहित्य, संगीत आणि कला या तिन्ही क्षेत्राचे जाणकार होते. या क्षेत्रातील “ज्ञानकोश’ अशी त्यांची साहित्य क्षेत्रामध्ये ओळख होती.
“मराठी : घटना, रचना आणि परंपरा’ हा त्यांनी वर्ष 1958 मधे संपादित केलेला ग्रंथ मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी आजही उपयुक्त आहे. त्यांचे स्वतंत्र लेखन फारसे नाही. वर्ष 1961 मधील “मेघदूत’चे त्यांनी केलेले संपादन अभ्यासपूर्ण आहे. वि. मो. केळकर यांच्या सहकार्याने त्यांनी संपादन केलेला “ज्ञानदेवी’ हा ग्रंथही अभ्यासक-संशोधकांना मार्गदर्शक ठरला आहे. वर्ष 1961 मध्ये “नीतिशतक’ हा ग्रंथ त्यांनी संपादित केला होता. तसेच मृत्यूपूर्वी दोनच वर्षे आधी त्यांचा “शेफालिका’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. तो सातवाहन कुळातील सतरावा राजा हाल याने लिहिलेल्या पहिल्या प्राकृत भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे.
11व्या शतकामध्ये काश्मिरी पंडित आचार्य मम्मट हे मान्यताप्राप्त संस्कृत पंडित होते. त्यांनी “काव्यप्रकास’ हा ग्रंथ लिहिला होता. त्यावर “मम्मटाचा काव्यप्रकाश’ हा अर्जुनवाडकर यांच्या सहकार्याने आणि मंगरूळकर यांनी सुमारे हजार पृष्ठांचा विवेचक ग्रंथ संपादित केला. हा ग्रंथ वाचून आचार्य अत्रे खूपच प्रभावित होऊन गडबडा लोळले असे सांगितले जाते, ही आख्यायिका नसून सत्य घटना आहे; अशी नोंद म. श्री. दीक्षित यांनी केली आहे. अग्निहोत्री संपादित पंचखंडी मराठी शब्दकोशाच्या निर्मितीतही मंगरूळकर यांचा मोठा वाटा आहे. मराठी विश्वकोशामध्ये मंगरूळकर यांनी संगीत व संस्कृत या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे, त्यांचे मराठी-संस्कृत साहित्यावर संशोधनात्मक व समीक्षात्मक लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतून (पुणे) प्रसिद्ध झाले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून त्यांनी सुमारे दहा वर्षे जबाबदारी सांभाळली होती. पुण्यात भरत असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात झालेल्या कार्यक्रमांचे ते वृत्तपत्रांतून मार्मिक रसग्रहण करीत.कालिदासाचे मेघदूत (संपादित), नीतिशतक (संपादित), मराठी घटना, रचना आणि परंपरा, सातवाहन राज्याच्या शेफालिका (मूळ संस्कृतचा मराठी गद्यानुवाद) तसेच ज्ञानदेवांचे पसायदान (सहलेखक- विनायक मोरेश्वर केळकर) हे त्यांचे ग्रंथ आहेत. 27 मे 1986 रोजी त्यांचे निधन झाले.