पुणे – पुण्यात मुख्यालय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने पहिल्या तीमाईचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र बॅंकेला झालेला नफा 95% वाढून 882 कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीत बॅंकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न वाढले. त्याचबरोबर अनुत्पादक कर्जाची रक्कम कमी झाली आहे.
यामुळे बॅंकेला नफा वाढला आहे. आगामी काळाबाबत बॅंक आशावादी असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी सांगितले. ते म्हणाले की, आगामी काळात कर्जपुरवठा 20 ते 22 टक्यांनी तर ठेवी 14 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित बॅंकेला 452 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेचे व्याजातून उत्पन्न या तिमाहीत वाढून 4,789 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ही रक्कम 3,457 कोटी रुपये होती.
बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 2.28% इतकी झाली आहे. गेल्यावर्षी ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 3.74% इतकी होती. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.24% इतकी आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 0.88% इतके होते. कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी बॅंक या वर्षात आणखी 2 हजार कोटी रुपयांची भांडवल उभारणी करणार आहे. तसेच या आर्थिक वर्षामध्ये 3,000 कोटी रुपयांची कर्ज वसुली होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र बॅंकेने हा चमकदार ताळेबंद जाहीर केल्यानंतर आज बॅंकेचा शेअरचा भाव तब्बल सहा टक्क्यांनी वाढून 33.28 रुपये प्रति शेअर पातळीवर गेला होता. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर या बॅंकेच्या शेअरचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. बॅंकेने सर्व आघाड्यावर चांगली कामगिरी केली असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या बॅंकेच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.