आळंदी, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची एकमेव शाखा असल्याने या ठिकाणी दररोज गर्दी होते; तरीही बँकेकडून योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने ग्राहक कमालीचे संतप्त झाले असून ही शाखा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झली आहे. दरम्यान, ग्राहकांना विनाअडथळा सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर बँकेला टाळे ठोकू असा इशारा खातेदारांनी दिला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून बँकेची व्याप्ती एवढी वाढली आहे की, दहापट ग्राहकांची संख्या झाली आहे. त्यामुळे कामकाजाचा ताण येथील कर्मचार्यांवर कमालीचा होतो आहे. शाखेची जागा देखील अजून बँकेने वाढवलेली नाही, त्यामुळे अतिशय कमी जागेत ग्राहकांना हालचाल करावी लागते तसेच बँकेमध्ये गेली दहा वर्षांपासून नवीन कर्मचार्यांची भरती केली नाही.
त्यामुळे कमालीचा ताण या कर्मचारी वर्गावर पडतो तसेच ग्राहकांना देखील या ठिकाणी आपली कामे होण्यासाठी कमीत कमी एक तासाचा अवधी लागतो. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी अशी सुविधा नसल्याने त्यांना देखील सर्वसामान्यांप्रमाणे रांगेमध्ये तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.
आळंदी शाखेचे व्यवस्थापक म्हणाले की, या शाखेत कर्मचारी कमी व कामकाजाचा व्याप जास्त अशी परिस्थिती असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. वरिष्ठांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून कर्मचारी भरण्याची मागणी करत असताना देखील या ठिकाणी कर्मचार्यांची संख्या वरिष्ठांकडून वाढवली जात नाही, असे त्यांनी सांगितले.