मुंबई :- “अजित पवारांनी राज्यासाठी चांगले काम करावे, कारण सत्तेसाठी साठमारी सध्या राज्यात सुरू आहेत. अजित पवारांनी अडीच वर्षे माझ्यासोबत काम केले असून त्यांचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत मला माहिती असल्याने मी खात्रीने सांगतो ते जनतेसाठी काम करतील. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केले.
तसेच, राज्यातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न व अन्य सर्व विषयावर या भेटीत चर्चा झाल्याचेही ठाकरेंनी यावेळी सांगितले. विरोधी गोटात असूनही ठाकरेंनी अजितदादांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत.
ठाकरे पुढे म्हणाले की, अजित पवार निधी देत नाही म्हणून भाजपसोबत जाणारा शिंदे गट आज अजित पवारांसोबत काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे की, यांनी पक्ष सोडत भाजपला साथ का दिली ते. हा धृतराष्ट्राचा नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.
मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही…
विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावरही भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले की, “मी असे किळसवाणे आणि विभत्स व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटत त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे.”