नगर – एसटी महामंडळाच्या नगर विभागाने दिवाळीत जादा वाहतूक सुरू ठेवली होती. या जादा वाहतुकीतून विभागाला जवळपास 9 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीत अकरा दिवस जादा वाहतूक सुरू होती. करोनानंतर यंदा पहिल्यांदाच नगरच्या एसटीला कोटीत उत्पन्न मिळाले आहे.
दिवाळी सणात गावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत असल्याने या काळात एसटीकडून नेहमीच जादा वाहतूक सुरू केली जाते. उत्पन्न वाढीचा हा काळ असल्याने या काळात हंगामी भाडेवाढ केली जाते. तशी यंदाही दहा टक्के भाडेवाढ केली होती. करोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामुळे यंदा बसस्थानकांत प्रवाशांची जास्त गर्दी दिसून आली. त्याचा फायदा महामंडळाला झाला. उत्पन्नात वाढ झाली. 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात तब्बल 8 कोटी 95 लाख 88 हजार रुपये उत्पन्न नगर विभागाला मिळाले. जिल्ह्यातील सर्वच आगारांना उत्पन्न मिळाले आहे. या काळात एसटी बसने जवळपास 23 लाख 9 हजार किलोमीटर अंतर पार केले.
तारकपूर आगारास 1 कोटी 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच शेवगाव 70 लाख 86 हजार, जामखेड 72 लाख 93 हजार, श्रीरामपूर 89 लाख 11 हजार, कोपरगाव 1 कोटी 1 लाख 65 हजार, पारनेर 70 लाख 98 हजार, संगमनेर 91 लाख 68 हजार, श्रीगोंदा 78 लाख 78 हजार, नेवासा 69 लाख 48 हजार, पाथर्डी 72 लाख 78 हजार आणि अकोले आगारास 66 लाख 9 हजार रुपये उत्पन्न जादा वाहतुकीद्वारे मिळाले.
दरम्यान, सध्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने महामंडळाचा तोटा वाढला आहे. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत महामंडळ मागे पडत आहे. प्रवासी मिळत नसल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत दुरावलेला प्रवासी पुन्हा वळविण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.