पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – एक देश, एक हेल्पलाइन या उद्देशाने सुरू केलेल्या डायल 112 ची नुकतीच वर्षपूर्ती झाली. पिंपरी-चिंचवड शहरात सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा आरंभ झाला. या हेल्पलाइनवर सुरुवातीला दररोज 60 ते 65 तक्रारी येत. वर्षभरात त्याचे प्रमाण वाढून दररोज सुमारे 200 ते 250 तक्रारी येऊ लागल्या आहेत. महिनाभरात सरासरी तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा निपटारा केला जात आहे. गेल्या 14 महिन्यांमध्ये 76 हजार 91 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
‘डायल 112’ ही हेल्पलाइन शासनाने राज्यस्तरावर सुरू केली आहे. या हेल्पलाइनचे प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर महापे, नवी मुंबई येथे आहे. तर सेकंडरी कॉन्टॅक्ट सेंटर नागपूर येथे आहे. नागरिकांनी 112 या हेल्पलाइनवर फोन केल्यास संबंधित कॉलरला कोणत्या प्रकारची मदत पाहिजे, याबाबत विचारले जाते. पोलीस मदत पाहिजे असल्यास तात्काळ कॉलरचे लोकेशन बघितले जाते. त्यानुसार ती व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, त्या परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षात क्षणात माहिती दिली जाते.सर्व पोलीस नियंत्रण कक्षांमध्ये 112 या हेल्पलाइनसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षातील 112 हेल्पलाइनच्या संगणकावर कॉलरची माहिती दिली जाते. त्यानंतर नियंत्रण कक्षातून कॉलर व्यक्तीच्या जवळपास जे हेल्पलाइन वाहन उपलब्ध आहे, त्या (रिस्पॉडंट) वाहनातील यंत्रणेवर माहिती दिली जाते आणि ते पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचतात.
डायल 112 ही हेल्पलाइन 8 सप्टेंबर 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सुरू झाली. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक आणि नियंत्रण कक्षासाठी एक अशी 19 चारचाकी वाहने यासाठी देण्यात आली आहेत. तर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 44 दुचाकी देण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील सहा पोलीस अधिका-यांना या हेल्पलाइन बाबत (सुपरवायजर) प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील 14 पोलीस अंमलदारांना प्रेषक (डिस्पॅचर) प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यांमधील 237 पोलीस अंमलदारांना प्रतिसादक (रिस्पॉडंट) प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालयास नुकतीच भेट दिली. त्यावेळी आयुक्तालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून दोन कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केला. त्यातून काही वाहने खरेदी केली जाणार असून ती डायल 112 या उपक्रमासाठी दिली जाणार आहेत.
प्रतिसाद देण्याच्या वेळेत सुधारणा
वाहतूक, घरगुती हिंसाचार, हाणामारी, सामाजिक शांततेस बाधा यांपासून ते गंभीर गुन्ह्यांबाबत सर्व प्रकारच्या तक्रारी या हेल्पलाइनवर येत आहेत. उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर कॉलच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पोलिसांना 39 मिनिटांहून अधिक वेळ लागत असे. हा रिस्पॉन्स टाइम देखील पोलिसांनी कमी केला आहे. वर्षभरात रिस्पॉन्स टाइम 10 मिनिटे 24 सेकंद एवढा कमी झाला आहे. 112 या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यातही तात्काळ समजाव्यात. त्या तक्रारीची स्थिती आणि पोलिसांनी काय प्रतिसाद दिला याचीही माहिती मिळावी यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये यंत्रणा उभारली जात आहे. याचा तक्रारदारांना फायदा होईल, तसेच पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास त्या यंत्रणेची मदत होणार आहे.
डायल 112 ही हेल्पलाइन आयुक्तालयात सुरू होऊन वर्ष झाले आहे. वेळोवेळी त्यात सुधारणा केली जात आहे. पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम सुधारत आहे. त्यासाठी आणखी वाहने, मनुष्यबळ देण्यात येईल. ही हेल्पलाइन बळकट करून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेऊन काम केले जात आहे.
– अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त