ठाणे – राज्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. राज्यभरात शेतीच्या कामांना वेग आला असून यंदा खरीप हंगामासाठी 87 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी गुरुवारी दिली. तसेच हंगामात शेतकऱ्यांसाठी खते आणि बियाणे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामात एकूण 142 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीखाली असून एकूण 123.78 लाख हेक्टर पेरणी झाली आहे. राज्यात 1 जून ते 31 जुलै दरम्यान 570.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, जो सरासरी 538.50 मि.मी. पावसाच्या 106 टक्के आहे. राज्यात विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर आणि भात पिकांच्या पुर्नलागवडीला वेग आला आहे. 31 जुलैपर्यंत 46.72 लाख हेक्टरवर सोयाबीन, 40.84 लाख हेक्टरवर कापूस, 10.21 लाख हेक्टरवर तूर पेरणी झाली आहे.
आतापर्यंत 52.13 लाख मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी 26.02 लाख टनांची विक्री झाली असून 26.11 लाख टन खते शिल्लक आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.