कराड – महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एकजूट झाल्याने सरकार खडबडून जागे झाले असून समित्याही कामाला लागल्यात. मराठा कुणबी असल्याचे लाखो पुरावे मिळत आहेत, हेच आपल्या आंदोलनाचे मोठे यश आहे. मला अनेकांनी प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला. पण गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला असून मेलो तरी बेहत्तर, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मध्यरात्री एक वाजता कराड, पाटण तालुक्यासह आसपासच्या परिसरातील लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत जमलेल्या लाखो मराठा बांधवांमधील एकही मराठा जागचा हलला नाही.
जरांगे-पाटील म्हणाले, आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समित्यांनी मराठा कुणबी नोंदींचे पुरावे न सापडल्याने मराठ्यांना आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले. एवढा दबाव 70 वर्षांत सरकारवर होता. आता राज्याच्या कानाकोपऱ्यातील करोडो मराठा एकवटल्याने सरकारला नमतं घ्यावं लागलं.
1805-1967 ते 2023 पर्यंतचे पुरावे शोधण्यासाठी समित्याही झाडून कामाला लागल्या. त्यांना लाखो पुरावे सापडले असून मराठा ओबीसी आरक्षणात असल्याचे सिद्ध झाले आहे. जर मराठा समाज आरक्षणात होता! तर त्याचे पुरावे कोणी सापडू दिले नाहीत, त्याची माहिती सरकारने आम्हाला दिली पाहिजे. 70 वर्षांपूर्वी आम्हाला आरक्षण असतं, तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून मराठ्यांचेच वर्चस्व राहिले असते, असा ठाम विश्वासही जरांगे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.ते म्हणाले, मराठी कुणबी असल्याचे सिद्ध करण्यासाठी सध्याच्या सरकारने स्थापन केलेल्या पहिल्या समितीला महिनाभरात काही करता आले नाही. दुसऱ्या समितीने हैदराबाद-मुंबई-छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद असे हेलपाटे घातले. त्यांना पुरावेत सापडले नाहीत.
परंतु, मोडी, उर्दू व फार्शी भाषेत असलेले पुरावे पडताळून पाहण्यासाठी त्यांनी अभ्यासक न्यायला हवे होते. त्यांनतर त्यांना पाच हजार पुरावे कसे सापडले? या पुराव्यांवरून सरसकट आरक्षण देण्याची आम्ही मागणी केली. परंतु, मराठवाड्याला आरक्षण मिळेल, असे सरकारने सांगितले. मात्र, आपण भेदभाव करणार नसून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. सध्या सरकारने नेमलेल्या समित्या जिल्हा-जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदणी शोधत असून त्यांना लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. संबंधितांना तसे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली आहे, हेही आपल्या आंदोलनाचे यश आहे.
एक डिसेंबरपासून गावा-गावात साखळी उपोषण सुरू करा. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटायचे नाही. मराठा कुणबींच्या सापडलेल्या नोंदणीचा अहवाल सरकारला सादर होईल. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना त्याच अहवालाच्या आधारे 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. आपण 70 टक्के लढाई जिंकल्याने त्यांना राज्यात जातीय दंगली घडवून आंदोलनाची दिशा बदलायची आहे. राजकीय स्वार्थापोटीचे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. यशवंत गोसावी, भूषण जगताप, ऍड. दीपक थोरात, कुमारी सई पाटील, मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाली जाधव, मनोहर यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कुमारी शिवांजली कदम हिने शिव गारद दिली.
भुजबळांनी पातळी सोडली
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जरांगे-पाटील म्हणाले, मी कुणाला घाबरत नाही. पण, मराठा आरक्षणाविरोधात बोलेल त्याला सोडणार नाही. घटनेच्या पदावर बसून, पालकत्व स्वीकारून एका जातीच्या बाजूने बोलले योग्य नाही. जातीय दंगली होतील, असे बोलू नका. आम्ही शांततेत लढत असून आम्ही 50 टक्के आहोत, याचे भान ठेवा, असा सूचक इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. तसेच माझा व्यक्तीला नव्हे; तर विचाराला विरोध होता. परंतु, भुजबळांनी पातळी सोडली आहे. त्यांना किंमत देण्याची गरज नाही. मराठ्यांनीच त्यांना मोठ्ठं केलं असून आता त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले.
… मग ज्यांचे झेंडे उचलायचे त्यांचे उचला
राजकारण करायचे तेव्हा करा. अगोदर आपल्या मुलांना आरक्षण देऊन आयुष्यभराची भाकरी त्यांना मिळवून द्या. मग ज्यांचे झेंडे उचलायचे त्यांचे खुशाल उचला. आपल्या मदतीला कोणीही येणार नाही, हा लढा आपल्यालाच जिंकायचा आहे. 70 टक्के लढाई आपण जिंकली असून 30 टक्के बाकी आहे. त्यामुळे एकसंघ रहा. माथी भडकवण्याचा, जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु, संयम राखा, प्रत्युत्तर देऊ नका. आरक्षण पदरात पाडून घ्या, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी यावेळी केले.
================