बीजिंग – चीनने तिबेट गिळंकृत केल्याला २८ मार्च रोजी तब्बल ६५ वर्षे पूर्ण झाली. भारत आणि भूतानच्या सीमेजवळील या छोट्या देशावर बिनविरोध ताबा मिळवल्याच्या आनंदाप्रित्यर्थ चीनच्या सीमाभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तिबेटमधील लोकशाही प्रक्रीयेमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली २८ मार्च १९५१ रोजी चीनने दलाई लामा यांची राजवट सपुष्टात आणली आणि तिबेट हा चीनचा भाग असल्याचे जाहीर करून टाकले होते.
चीनच्या आक्रमणानंतर १९५९ मध्ये दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. अलिकडे चीनच्या नामबदलाच्या मोहिमेंतर्गत तिबेटला शिझांग असे चिनी भाषेतले नाव देण्यात आले आहे. या शिझांग प्रांतात चीनकडून वेगाने सुधारणा केल्या जात आहेत.
येथे ४ जी नेटवर्कचे १०० टक्के संलग्नता झाली आहे, असे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे उपसचिव, झिझांग स्वायत्त प्रादेशिक समिती आणि झिझांग स्वायत्त प्रदेशाच्या पीपल्स गव्हर्नमेंटचे अध्यक्ष यान जिन्हाई यांनी म्हटले आहे.
सीमाभागात मोठे प्रकल्प…
भारत आणि भूतान दरम्याच्या सीमेलगत नव्याने वसवण्यात आलेल्या चीनच्या गावात आनंदोत्सव साजरा झाल्याचे वृत्त चिनी सरकारी वृत्तसंस्थांनी दिले आहे. भारत आणि भूतान दोन्ही देशांच्या सीमाभागात चीन मोठ्या प्रमाणात आधुनिक गावांचे जाळे उभे करत आहे.
भूतानूबरोबरच्या वादग्रस्त सीमाभागात नवीन इमारतींचे जाळे असलेली ३ गावे बसवण्यात येत आहेत. ही गावे चीनच्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक सुविधांसह उभी केली जात आहेत. मात्र यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा धोका दुपटीने वाढला आहे.
आतापर्यंत चीनने सीमावर्ती भागात सुमारे ६२४ गावे बांधली आहेत. शिझांग प्रांताच्या सुधारणेसाठी धोरण, प्रकल्प आणि निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.