जम्मू-काश्मीर : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये केवळ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ठेचला गेला नाही, तर दहशतवाद-अलिप्ततावादाशी संबंधित संपूर्ण इको-सिस्टमवर हल्ला केला जात आहे. गेल्या चार वर्षांत दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांची १५० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बँकेत जमा असलेली १२२ कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांना ठार मारण्यासोबतच दहशतवाद आणि फुटीरतावादासाठी पाकिस्तानातून येणाऱ्या पैशावरही अंकुश लावण्यात आला आहे. टेरर फंडिंगच्या ८३ केसेसची नोंद करून, दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या २२९ सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने ३२ तर एसआयएने ५१ गुन्हे दाखल केले आहेत. दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांच्या१५० कोटींहून अधिक किमतीच्या ६१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांशी संबंधित १३४ बँक खाती सील केली आहेत. त्यातील १२२ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच या लोकांकडून साडेपाच कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
कलम ३७० हटवल्यानंतर केवळ दहशतवादाच्या घटना कमी झाल्याच शिवाय दगडफेक आणि हल्ले थांबले. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीतही मोठी घट झाली आहे. आता दगडफेक करणारे एकतर खेळात मग्न आहेत किंवा काही काम करत आहेत. संपूर्ण काश्मीरचे बदललेले आशादायक चित्र न बोलता बरेच काही सांगून जाते आहे.