पिंपरी – खराब रस्ते, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. परंतु चालकांचा हलगर्जीपणा आणि नियम धाब्यावर बसवून वाहन चालविल्यामुळे सर्वाधिक अपघात होतात. चालू वर्षात 340 तर मागील पाच वर्षांत 1605 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यावर्षी 19 डिसेंबर पर्यंत 792 अपघात झाले असून त्यात 458 जण जखमी झाले आहेत. वाहनांचे झालेले नुकसान देखील मोठे आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. शहरात वाहनांची संख्या 18 लाखांहून अधिक आहे. सोबतच खासगी वाहतूक सेवा देणारी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने देखील आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वर्दळ असते. नियोजितपणे वसलेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. शहरातले रस्ते, उड्डाणपूल प्रशस्त आहेत. काही रस्ते सरळ आणि प्रशस्त असल्याने अनेक वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही. परिणामस्वरुप अपघात होण्याचे प्रमाण वाढते. वाहतुकीला शिस्त नसल्याने अपघात होतात. या अपघातांचे खापर केवळ बेशिस्त वाहन चालकांच्या माथी फोडून चालणार नाही. खड्डेमय रस्ते सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे देखील शहरात अनेक अपघात झाले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही बचत बरी नव्हे
जरासा उतार दिसला तरी वाहन चालक थोडेसे पेट्रोल, डिझेल वाचविण्यासाठी वाहन न्यूट्रल किंवा बंद करतात. यामुळे वाहनाचे ब्रेक तातडीने लागत नाहीत. त्यामुळे समोरच्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. अवजड वाहनाने मागून धडक देऊन झालेल्या अपघातांचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. दुचाकीस्वारांना धडक देऊन मोठी वाहने पुढे गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
ही आहेत कारणे
अवजड वाहनांची धडक बसल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यातही मृत्यू हा पादचारी व्यक्ती किंवा दुचाकीस्वाराचाच होतो. मोठ्या वाहनात बसलेल्यांचा शक्यतो मृत्यू होत नाही, एवढेच काय तर ते गंभीर जखमीही होत नाहीत. यामुळे अवजड वाहनांना ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांनी आणि रस्ता क्रॉस करताना पादचारी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वाहन बिघडल्यानंतर भर रस्त्यात ते उभे केल्याने त्या वाहनांना धडकून देखील काही अपघात झाले आहेत. एकंदरीत वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वास्तव
यावर्षी 792 अपघातांत 340 जणांचा मृत्यू
रस्त्यावरील खड्ड्यांनीही केले अनेकांना जायबंदी
प्रशस्त रस्ते, वेगाचा मोहही ठरतोय कारण
दरवर्षी 300हून
अधिक अपघाती मृत्यू