डोर्लेवाडी – बारामती तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे प्राबल्य आणखीनच मजबूत झाले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बारामती तालुक्यातील विरोधी पक्षाला आणखीनच झगडावे लागणार आहे. हे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे. आता बारामती तालुक्यातील विरोधक ग्रामपंचायत निवडणुकीत अपयश पदरी आलेल्या विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात सर्वच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यात पणदरे, वानेवाडी, वाघळवाडी, पळशी, मासाळवाडी, कुरणेवाडी, मुरूम, गरदडवाडी, लोणी भापकर, सोरटेवाडी, मोरगाव, काऱ्हाटी, सोनकसवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश होता.
बारामती तालुका हा राज्य आणि देशपातळीवर नेहमीच चर्चेत, संवेदनशील आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाच्या दिल्लीच्या हायकंमाडने मिशन 45 ही मोहीम हाती घेतली आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
त्यामुळे भाजपाचे दिल्ली दरबारातील मंत्री मुक्कामी तळ ठोकून असतात. गावपातळीवरील संघटन हे भाजपासाठी पोषक वातावरण तयार करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायती निवडणुकीत राष्ट्रवादीची झालेली सरशी ही भविष्यात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
दिग्गजांच्या पदरी अपयश
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या अनेक दिगजांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. यात पणदरे, कुरणेवाडी, वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनी बाजी मारली आहे. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिग्गजांना उमेदवारी देताना नेतेमंडळींकडून विचार केला जाणार यात शंका नाही.
युवा नेतृत्वाचे संकेत
गेल्या पाच ते आठ वर्षांत ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना निवडणुकीत युवकांची फळी राजकारणात सक्रिय होऊ लागली आहे. प्रत्येक गावांत युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोट बांधून निवडणूक लढविली जात आहे. सर्वसमावशेक उमेदवार हा जनतेच्या पसंतीस उतरत आहे. हे निकावरून दिसत आहे. त्यामुळे येत्या दहा वर्षांत तरूणाई नेतृत्व करणार, याचे संकेत मिळत आहे.
आगामी निवडणुकीत बंडखोरीची झळ?
राज्यात पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंच निर्णय घेतला. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत एका वॉर्डऐवजी सर्व वॉर्डमधून सरपंचाला लढत द्यावी लागली. त्यामुळे अनेक सरपंचाना वारेमाप पैसा खर्च झाला असल्याचे बोलले जात आहे. बारामती तालुक्यात सर्व ठिकाणी राष्ट्रवादी असली तरी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक अनेकजण असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.