पुणे – पुणे जिल्हा परिषदेने सन 2014 मध्ये घोषित केलेल्या कर्मचारी भरतीसाठी सुमारे 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने या अर्जापोटी घेण्यात आलेल्या प्रत्येकी 500 आणि 250 रुपये शुल्काचे 1 कोटी 28 लाख रुपये जिल्हा परिषदेकडे जमा आहेत. आता हे पैसे त्या उमेदवारांना तब्बल नऊ वर्षांनंतर परत केले जाणार आहेत.
मागील काळात सरळसेवा परीक्षांच्या जाहिराती आल्या. उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले. परीक्षा शुल्क भरली, पण काही कारणास्तव परीक्षा रद्द झाल्या. परीक्षाच झाली नसेल, तर शासनाने विद्यार्थ्यांना शुल्काचे पैसे परत करणे आवश्यक आहे. ही बाब आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. उमेदवारांना शुल्काची रक्कम त्वरित परत करावी, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे यापूर्वी घोषित केलेल्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या शुल्काचा परतावा केव्हा मिळणार, अशी विचारणा उमेदवारांकडून होत होती. त्यानंतर आता ग्राम विकास विभागाने हे अर्जाचे शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला.
सन 2014 मधील जिल्हा परिषद कर्मचारी भरती यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे म्हणाले, “सन 2014 मधील उमेदवारांचे पैसे परत करण्यासाठी त्यांना मेसेज पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून बॅंकेचा तपशील घेऊन ऑनलाइन पद्धतीने हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातील.’