नागपूर – गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणामुळे भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी संपूर्ण राज्याने पाहिल्या. यादरम्यान भुजबळांनी ओबीसी समाजासाठी सुरु असलेल्या अनेक योजनांना निधी मिळत नसल्याचे देखील म्हंटले होते. सध्या नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांचा हा दावा खोडून काढत ५५० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सभागृहात सांगितले.
हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसह इतर समाजाच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत भाष्य केलं होत. भुजबळ म्हणाले होते आजवर ओबीसींना कमी निधी देण्यात आला आहे. असे नुमूद करत इतर संस्थाना ज्या प्रमाणे निधी दिला जातो त्याचप्रमाणे ओबीसी संस्थांना देखील निधी द्यावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात बोलताना महाज्योतीला ५५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे अशी माहिती दिली. त्यासह सारथी आणि बार्टीसाठी ३०० कोटी रुपये दिले,.धनगर समाजासाठी १४० कोटींची तरतूद केली. तसेच धनगर समाजासाठी दहा हजार घरे बांधणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ७ हजार २०० विद्यार्थ्यांना मदत केली असून ओबीसींसाठी अनेक घोषणा केलेल्या आहेत असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात म्हंटले.
काय म्हणाले होते भुजबळ नेमकं
राज्य सारथी, बार्टी तार्ती यासह विविध संस्थाना शासन निधी देतंय. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाला महाज्योतीला देखील निधी द्यावा. आजवर इतर संस्थांना ज्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यात आजवर ओबीसींना कमी देण्यात आला आहे. असे नुमूद करत इतर संस्थाना ज्या प्रमाणे निधी दिला जातो त्याचप्रमाणे ओबीसी संस्थांना देखील निधी द्यावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.
त्यासोबत सारथी कार्यालयाबाबत देखील भुजबळांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला होता. त्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यासाठी जाहीर करण्यात आलेली ७२ वसतिगृह तातडीने सुरु करण्याची मागणी देखील भुजबळांनी यावेळी केली होती.