वाठार स्टेशन -करोनामुळे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असतानाही विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्यांवर वाठार पोलिसांनी कारवाई करत 55 दुचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, विनाकारण फिरणारी काही चारचाकी वाहनेसुद्धा पोलिसांनी यावेळी कारवाई करुन जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संचारबंदीच्या काळात वाठार पोलिसांनी इतरही विविध प्रकारचे 13 गुन्हे दाखल केले आहेत.
करोनामुळे देशभरात लॉकडाऊन केले असून जिल्ह्यातही अत्यावश्यक सेवा वगळत सर्व काही बंद आहे. तसेच विनाकारण कोणीही घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही काहीजण विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरत असल्याने शनिवारी वाठार पोलिसांनी 55 दुचाकी कारवाई करुन जप्त केल्या.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशानुसार वाठार स्टेशनचे सपोनि स्वप्नील घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितीन भोसले, सचिन जगताप, अतुल कुंभार, इम्रान मुलाणी, चोरट, गहिन, यांनी केल्या.