लाहोर – पोलिसांनी आज पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या 540 नेत्यांना हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली अटक केली. पंजाबमधील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांनंतर आणि प्रामुख्याने लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊस इमारतीवरील हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी या नेत्यांना अटक केली आहे. दिनांक 9 मे पासून पंजाब पोलिसांनी “पीटीआय’चे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात 205 प्रकरणे दाखल केली आहेत.
गुरुवारी रात्री पोलिसांनी लाहोरमधील “पीटीआय’च्या कार्यालयावर छापा घातला. तेंव्हा पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. पक्षाच्या काही नेत्यांच्या अटकेसाठी हा छापा घालण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र अधिक कुमक मागवल्यानंतर त्यांनी माघार घेतली.
झमान पार्क येथे म्रिान खान यांचे आगमन होणार असल्याचे समजताच तेथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमायला लागली होती.म्हणून पोलिसांनी तेथील बंदोबस्तात वाढ केली. पोलीस पथके, महत्वाच्या इमारती आमि सार्वजनिक, खासगी मालमत्तांवर हल्ले करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. सीसीटिव्हीच्या आधारे या समाजकंटकांची ओळख पटवण्यात येत आहे, असे पंजाबचे पोलीस प्रमुख डॉ. उस्मान अमन्वर यांनी सांगितले.