औंध – मुळशी तालुक्यातील धरण हे टाटा कंपनीचे असून त्यावर या कंपनीच्या वतीने वीजनिर्मिती केली जाते. परंतु, पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही, आता विविध माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते, त्यामुळे महाराष्ट्र शासन टाटा कंपनीला 5 टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात तेवढी वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, यासाठी महाराष्ट्र शासनाची विशेष समिती त्यावर काम करीत आहे. त्यामुळे पुणे शहराला लवकरात लवकर 5 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बालेवाडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, प्रभाग क्र. 9, डॉ. सागर गणपतराव बालवडकर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. सुस आणि महाळुुंगे गावासह इतर 23 गावे आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली असून इतर शहराप्रमाणे या गावांनाही मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेच्या वतीने निधी कमी पडू देणार नाही. 2012-13 मध्ये बाबुराव चांदेरे यांच्यावर स्थायी समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्या कार्यकाळात बाणेर-बालेवाडी परिसराचा नियोजन बद्ध विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचप्रमाणे पीएमआरडीने महाळुुंगे गावाचा डीपी प्लॅन तयार केला असून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेऊ, असे पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रशांत जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक बाबुराव चांदेरे, खंडेराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, नगरसेवक मयूर कलाटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे, सुनील चांदेरे, नामदेव चांदेरे, समीर चांदेरे, सुहास भोते, सुखदेव चांदेरे, पुनम विशाल विधाते, मनोज बालवडकर, चंद्रशेखर जगताप, पोपटराव पाडाळे, युवराज कोळेकर, निलेश पाडाळे, अजिंक्य निकाळजे आदी उपस्थित होते.
…महिलांबाबत स्तुत्य निर्णय
जनसंपर्क कार्यालय हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते, या ठिकाणी परिसरातील सर्व घटक आपल्या समस्या घेऊन येत असतात. यामध्ये महिला घटकही असतात. परंतु, त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी महिला सदस्या जनसंपर्क कार्यालयात असणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच डॉ. सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्राध्यापिका रूपाली सागर बालवडकर या स्वत: महिलांचे प्रश्न, समस्या ऐकण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. हा खूप स्तुत्य निर्णय असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.