प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 –लाखो रुपयांची बिले घेऊनही रस्त्यांचे कामे निकृष्ट केल्याने खड्ड्यांना जबाबदार असलेल्या ठेकेदारांच्या खिशाला आता दंडाचा “खड्डा’ पड्णार आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या 140 रस्त्यांच्या कामात दोष दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड-डीएलपी) ज्या रस्त्यांना खड्डे पडले, त्यासाठी ठेकेदारांकडून प्रति खड्डा 5 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. यंदा पहिल्याच पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने राज्यस्तरावर टीकेची धनी बनलेल्या महापालिका प्रशासनाने खड्डयांसाठी ठेकेदारांना जबाबदार धरत हा निर्णय घेतला आहे.
शहरात गेल्या वर्षभरात खासगी केबल कंपन्या तसेच विविध प्रकल्पांसाठी जागोजागी रस्ते खोदाई झाली. यामुळे रस्त्यांची झाली असून तकलादू खड्डे दुरुस्तीही पावसाने उघडी पडली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून वाहतूक कोंडी आणि अपघात आणि पाठदुखीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. यावरून पुणेकर तसेच माध्यमांनीही महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले.
अखेर प्रशासनाने रस्ते दुरूस्ती सुरू करतानाच गेल्या 3 वर्षांत डांबरीकरण, पॅच वर्क केलेल्या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मुख्य खात्याकडील 139 रस्ते ही “डीएलपी’मधील आहेत. त्यांची तपासणी केली असता, 11 ठेकेदारांनी केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्रयस्थ संस्थेमार्फतही रस्त्याची पाहणी झाली असून, त्याचा अहवाल अजून पथ विभागाला सादर झालेला नाही. “डीएलपी’मधील रस्ते निकृष्ट झाल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे.
रस्त्यांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड संस्थेकडूनही रस्ते कामांची तपासणी करून घेण्यात येत आहे. संस्थेच्या अहवालानंतर संबंधित ठेकेदारांकडून दंड वसूल केला जाईल.
– व्ही. जी कुलकर्णी, पथ विभागप्रमुख