राजेंद्र जाधव : शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचा उपक्रम
15 गावांना 250 दिवसांच्यावर मशिनरी
शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे खटाव तालुक्यातील वरूड गावाला 45 दिवस, तरसवाडी 7 दिवस, कलेढोण 10 दिवस, विखळे 9 दिवस, पाचवड 20 दिवस, निमसोड 30 दिवस तसेच माण तालुक्यातील गोंदवले खुर्द 30 दिवस, पानवण 10 दिवस, काळचौंडी 7 दिवस, बोथे 15 दिवस, शिंदी बु. 22 दिवस, महिमानगड 15 दिवस, पिंगळी बु,25 दिवस, मार्डी 15 दिवस, शिंदी खुर्द 200 तास याबरोबरच चांगल्या काम करणाऱ्या गावाला वाढीव दिवस मशिनरी देण्याचेही काम प्रतिष्ठानतर्फे केले जात आहे. अशा प्रकारे 15 गावांना 250 दिवसांच्यावरती डिझेलसह पोकलेन मशिनरी पुरवण्याचे काम प्रतिष्ठानमार्फत केले जात आहे.
गोंदवले – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माण-खटाव तालुक्यातील गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. शेखरभाऊ गोरे यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना प्रोत्साहन देण्यासाठी जलसंधारणाच्या कामासाठी डिझेलसह पोकलेन मशिनरी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. याबरोबरच या स्पर्धेत माण-खटाव तालुक्यातील जे गाव वॉटर कप मिळवेल त्या गावाला शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रूपयांचे बक्षीसही शेखरभाऊ गोरे यांनी जाहीर केले असल्याची माहिती शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
वॉटर कप स्पर्धा सुरू झाल्यापासून माण-खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात मोठी जलक्रांती झाली आहे. वॉटर कप स्पर्धेच्या अगोदरपासूनच शेखरभाऊ गोरे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून माण- खटाव तालुक्यातील विविध गावे व वाड्यावस्त्यांवरील तलाव, बंधारे, ओढे- नाले, नालाबंडींगमधील गाळ काढण्यासाठी, भरावा टाकण्यासाठी, दुरुस्ती, खोलीकरण, रूंदीकरण तसेच विविध ठिकाणचे रस्त्यांवर मुरमीकरण, क्रॉंक्रिटीकरण आदींसाठी स्वखर्चाने मशिनरी लावून विकासकामे पूर्ण केली आहेत. विविध गावच्या स्वागत कमानी, पिकअप शेड, समाजमंदीरे, सभागृहे आदी विकास कामासाठीही कोणत्याही निधीचे, फंडाचे आश्वासन न देता ऑन द स्पॉट स्वखर्चातून ती विकासकामे केली आहेत.
या स्पर्धेत शेखरभाऊ गोरेंच्या मशिनरींच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम उभे केले जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून सहभागी गावांना प्रतिष्ठानतर्फे डिझेलसह मोफत मशिनरी दिली जात आहे. जे गाव या स्पर्धेत चांगले काम करत आहे त्या गावांना वाढीव मशिनरी देण्याचेही काम केले जात आहे. शेखरभाऊ गोरे व त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले स्पर्धेतील सहभागी गावांना भेटी देऊन त्यांच्यासमवेत श्रमदानही करत आहेत. जलसंधारणाच्या कामात गती यावी तसेच माण खटाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत या हेतूने त्यांनी या स्पर्धेत माण खटाव तालुक्यातील जे गाव वॉटर कप मिळविल त्या गावाला त्याचक्षणी प्रतिष्ठानतर्फे पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले असल्याचीही माहितीही राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
दुष्काळी माण-खटाव तालुक्यात जलसंधारणाची स्पर्धा सुरू झाल्यापासून शेखरभाऊ गोरेंच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकी जपत स्पर्धेत सहभागी गावांतील जलसंधारणाच्या कामांसाठी मशिनरींच्या माध्यमातून मदत केली जात आहे. याही वर्षी सहभागी 15 गावांना मशीनरी देऊन श्रमदात्यांना मदतीचा हात देण्याचे काम शेखरभाऊ गोरे करत आहेत.
– राजेंद्र जाधव, अध्यक्ष, शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान माण-खटाव