काही परकीय शक्ती देशात गोंधळ माजवू पाहत आहेत
नवी दिल्ली, ता. 15 – देशाबाहेरील काही शक्ती देशातील काही गटांना हाताशी धरून देशात गोंधळ माजवू पाहत आहेत, असा गंभीर इशारा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला. चिलीतील सरकार उलथण्यात आले, त्या संदर्भात इंदिरा गांधी यांनी हा इशारा दिला.
भारताच्या स्वतंत्र धोरणास विरोध असलेल्या शक्तींना येथल्या काही गटांनी आपली शक्ती विकली आहे, हे खेदाचे आहे. इंदिरा गांधी पुढे म्हणाल्या, इतर पक्षांतील पुरोगामी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात यावे. कोणाकडूनही देशात जातीयवाद फैलावण्याचा प्रयत्न झाला तर सरकार ते चालू देणार नाही.
राणी अण्णा दुराई यांचा अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश
मद्रास – द्रमुकचे संस्थापक कै. अण्णा दुराई यांच्या पत्नी श्रीमती राणी अण्णा दुराई यांनी आज अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश केला. एम. रामचंद्रन यांनी आज तसे जाहीर केले.
अशीही काटकसर!
नवी दिल्ली – अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अधिवेशनावर काटकसरीची छाया दिसत होती. या अधिवेशनास आलेल्या प्रतिनिधींना फक्त “बटाटेवडा’ उपलब्ध होता. पूर्वीच्या अधिवेशनाप्रमाणे जेवणाची सोय करण्यात आली नाही. प्रत्येक मंत्र्याने व पार्लमेंटच्या सभासदाने आपल्या भागातील प्रतिनिधींची जेवणाराहण्याची सोय पाहावी, असे सांगण्यात आले होते.
पाकिस्तानी नागरिकांना नेपाळचा इशारा
काठमांडू – बांगला देशात राहणाऱ्या पाकिस्तान्यांनी नेपाळात येऊ नये, असे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे. परराष्ट्र खात्याचा प्रवक्ता म्हणाला, बंदी मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. पाकिस्तान्यांनी नेपाळात घुसू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे विमान वाहतूक स्थगित
पुणे – इंडियन एअरलाइन्सच्या सुधारित वेळापत्रकानुसार
17 सप्टेंबर 1973 पासून मुंबई-पुणे दरम्यानची विमान वाहतूक पुढील सूचनेपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे.