घटनेच्या चौकटीत राहून देखील सामाजिक सुधारणा शक्य
त्रिवेंद्रम, ता. 03 – सत्ताधारी पक्षांनी पुरोगामी दृष्टिकोनातून कारभार केल्यास सध्याच्या घटनेचाच वापर करून मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणा करता येतील. कदाचित इतक्या मोठ्या सामाजिक सुधारणा घटना बनविणाऱ्यांना देखील अपेक्षित नसाव्यात,
असे उद्गार केरळचे मुख्यमंत्री अच्युत मेनन यांनी आज येथे काढले. त्यांनी केरळमधील खासगी जंगले नुकसानभरपाई न देता ताब्यात घेतल्याचे समर्थन केले. अशा तऱ्हेने क्रांतिकारक शेतकरी चळवळीचे ध्येय साकार करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
माध्यमिक शाळांत लैंगिक शिक्षणाची गरज नाही
गांधीनगर – माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची काही गरज नाही, असे मत शिक्षण खात्याचे राज्यमंत्री मगनलाल बारोत यांनी आज येथे व्यक्त केले. मानसिक विकृती निर्माण होण्यास लैंगिक शिक्षणाची कमतरता कारणीभूत आहे, असे मला वाटत नाही, असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला विधानसभेत दिले.
भाकरी पाहिजेलच, पण करमणुकीसाठी दूरचित्रवाणी जरूरी
पुणे – प्रत्येकास रोजची भाकरी मिळाली पाहिजे, परंतु म्हणून दूरचित्रवाणी नको, हे म्हणणे चूक आहे. भाकरीबरोबर दूरचित्रवाणीचा लाभ झाला तर तेही महत्त्वाचे आहे, असे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी येथील दूरचित्रवाणी सहक्षेपण केंद्राचे उद्घाटन करताना काढले. दूरचित्रवाणीचे महत्त्व सांगताना चव्हाण म्हणाले, आधुनिक जीवनात अतिशय जरूरी असलेल्या ज्ञानाच्या व तांत्रिक ज्ञानाच्या प्रसारात दूरचित्रवाणी महत्त्वाची भूमिका बजावीत असते.
चित्रपटांनी हिंसेला विरोध करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे
पुणे – शांतता व सहकार्य यांचे जग आपणास निर्माण करावयाचे असेल, व्यक्तिगत आणि सामुदायिक हक्कांचे रक्षण करावयाचे असेल तर हिंसेला विरोध करणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. चित्रपट काढताना इकडे लक्ष ठेवावयास हवे, असे उद्गार केंद्रीय माहिती आणि नभोवाणी खात्याचे राज्यमंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी येथे काढले.