भारत-पाक ऐतिहासिक करारामुळे भारतीय उपखंडात टिकाऊ स्वरूपाची शांतता निर्माण होणार
नवी दिल्ली, ता. 29 – भारतातील पाकिस्तानी युद्धकैदी, पाकिस्तानातील सर्व बंगाली व बांगला देशातील पाकिस्तानी नागरिक यांना स्वदेशी एकाच वेळी पाठविण्याची योजना काल येथे सह्या झालेल्या भारत-पाकिस्तान ऐतिहासिक करारात मान्य करण्यात आली आहे.
या करारामुळे 1971च्या भारत-पाक युद्धानंतर निर्माण झालेले मानवतावादी प्रश्न सोडविण्याचा मोठा प्रयत्न पूर्ण झाला आहे. बांगला देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तान स्वदेशात सामावून घेणार आहे.
सिमला कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत व पाकिस्तानने कालचा ऐतिहासिक करार करून एक पाऊल पुढे टाकले आहे. या करारामुळे सिद्ध झाले की, भारत, बांगला देश व पाकिस्तान ही समान पातळीवरची व सार्वभौम सत्ता असलेली राष्ट्रे आहेत.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात शस्त्रबंदी
पुणे – गणेशोत्सवाच्या काळात पुणे जिल्ह्यात शांतता सुरक्षितता राहण्याचे दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी कांगा यांनी जिल्ह्यात 30 ऑगस्टचे मध्यरात्रीपासून 11 सप्टेंबरचे मध्यरात्रीपर्यंत हत्यारबंदी हुकूम जारी केला आहे.
या काळात शासकीय सेवेतील व्यक्तीशिवाय इतर कोणाही व्यक्तीस रस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी लाठी काठी, भालाबरची, चाकू, गुप्ती, कुऱ्हाड, तलवार, बंदुक, पिस्तूल, स्फोटक द्रव्य वा पदार्थ, दगडगोटे वा इतर कोणतीही हत्यारे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रस्त्यावरील स्टॉलवाल्यांचा संघ स्थापन झाला
पुणे – येथे जी खोकीवजा दुकाने (स्टॉल्स) आहेत, ती चालविणाऱ्यांची एक “स्टॉल युनियन’ नुकतीच स्थापन झाली आहे. हे स्टॉल मनपाऐवजी स्टॉल मालकांच्या नावे करावीत, अशी त्यांची मागणी आहे