सीमावादाबाबत विरोधकांना विश्वासात घेऊ – चव्हाण
मुंबई, दि. 24 – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील तोडग्याचा विचार करताना विरोधकांना विश्वासात घेतले जाईल, असे सुस्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विधानसभेत दिले.
नवे पाटबंधारे विषयक विधेयक
मुंबई – कालव्याचे पाणी योग्य तऱ्हेने उपयोगात आणून चांगली पिके काढण्याबाबत नियंत्रण ठेवण्याचे जादा अधिकार सरकारला देणारे एक विधेयक राज्य सरकारने तयार केले आहे. पाटबंधारे व कालवेविषयक बिल असे त्याचे स्वरूप राहील. सदर विधेयक पाटबंधारे मंत्री वसंतराव पाटील यांनी मांडले. या विधेयकामुळे सध्याच्या पाटबंधारेविषयक सर्व कायद्याचे एकीकरण होणार आहे.
ग्रामीण वि. शहरी वादापासून जनतेने सावध राहावे
संगमनेर – लोकशाहीमध्ये ज्याचा आवाज मोठा त्याचा फायदाही मोठा आहे. परंतु शेतकरी संघटित नसल्यामुळे त्यांचा आवाज बाहेर येऊ शकत नाही याची मला खंत आहे. आजकाल ग्रामीण विरुद्ध शहरी वाद निर्माण केला जातो. त्यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे, असे मत आमदार गोविंदराव आदिक यांनी मांडले.
10 लाख टन साखरेची निर्यात
नवी दिल्ली – या वर्षी 10 लाख टन साखर निर्यात करणे भारताला शक्य होईल, असे आज लोकसभेत राज्यमंत्री शाहनवाझ खान यांनी सांगितले. देशातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा 6 लाख टन साखरेचे अधिक उत्पादन केले.