घटना दुरुस्तीबाबत संसदच सार्वभौम
नवी दिल्ली, दि. 2 – कायदे बनविणे व घटनेत दुरुस्त्या करणे याबाबतीत संसदेलाच सर्वोच्च अधिकार आहे व तो अधिकार कमी करण्याचे प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे आज लोकसभेत कायदामंत्री गोखले यांनी सांगितले.
गेल्या 25 वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन सरकारने घटनेत दुरुस्त्या कराव्यात असा एक बिनसरकारी ठराव कॉंग्रेस सदस्य के. पी. उन्नीकृष्णन् यांनी मांडला होता. गोखले पुढे म्हणाले, घटनेतील काही कलमांच्या कक्षेबाबत पुनर्पाहणी करण्याची वेळ आली आहे, याबाबत देशात जवळजवळ एकमत आहे.
छोट्या शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्णता
नवी दिल्ली – छोटी शस्त्रे, रायफल्स, छोट्या तोफा व लाइट मशीन गन्स यांच्या उत्पादनात देशातील शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यांनी स्वयंपूर्णता मिळविली आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
कुटुंब लहान असावे, असे कुंतीही म्हणाली होती
रुद्रपूर (उत्तर प्रदेश) – “कुटुंब लहान असले पाहिजे. कारण कितीही लोक सामावून घेऊ शकेल इतकी आपली भूमी विशाल नाही’ असे पांडवांची माता कुंतीने म्हटल्याचा महाभारतात उल्लेख आहे, असे आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे एका जाहीर सभेत केलेल्या भाषणांत सांगितले.