भारत-बांगलादेशानेच फराक्का समस्या सोडवावी
लंडन, दि. 13 – फराक्का प्रश्न हा बांगलादेश व भारत या दोघांमधील असून त्यात गुंतण्याची ब्रिटनची तयारी नाही, असे भारताचे विदेशमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी येथे सांगितले. चव्हाण यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान जेम्स कॅलॅघन व परराष्ट्रमंत्री अँक्नी क्रॉसलेंड यांच्याशी येथे चर्चा केली.
या दोन्ही नेत्यांशी झालेली चर्चा अत्यंत मित्रत्वाच्या व सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असे चव्हाण यांनी सांगितले. फराक्का प्रश्नाविषयी ते पुढे म्हणाले की, युनोतील बहुसंख्य राष्ट्रांचे मतही ब्रिटनप्रमाणेच आहे. चीन व भारतीय उपखंडातील परिस्थितीवर चर्चा झाली.
शेतकऱ्यांसाठी पवार यांचा तीन कलमी कार्यक्रम
नगर – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रगती होऊन तो सुखी आणि संपन्न व्हावा यासाठी महाराष्ट्राचे कृषिमंत्री शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी त्रिसूत्री कार्यक्रम सांगितला. पहिले सूत्र असे की, अधिक धान्योत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी आपल्याकडील पंचवीस टक्के जमिनीत नगदी पिके घ्यावीत.
दुसरे सूत्र, शेतीला पुरक दूध व्यवसाय वाढविण्यासाठी संकरित गायी पाळाव्यात. तिसरे सूत्र, शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त असावी. ज्या कारणासाठी पीक कर्ज घेतले ते त्या कारणासाठीच वापरावे. बॅंकेचे कर्ज वेळच्या वेळी परत केले पाहिजे.