मुंबई – ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे संघाचे आव्हान कमकुवत बनले आहे. मात्र, आता त्यासाठी याच खेळाडूंना दोषी धरले जात आहे. हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत संपूर्ण मोसमात फिट असतात. मात्र, आंतरराष्ट्रीय सामन्यांतून वर्कलोडच्या नावाखाली तसेच दुखापतींच्या कारणांनी विश्रांती घेतात, अशा शब्दांत आता टीका होत आहे.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, रवींद्र जडेजा यांच्यातील काहींनी विश्रांती घेण्याचा सपाटाच लावला होता. तर बुमराह, जडेजासह चहर व शमी दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात अनेक सामन्यांना मुकले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपासून 11 महिन्यांत टी-20 प्रकारात 35 सामने झाले आहेत. तसेच एकदिवसीय व कसोटी सामने धरले तर एकूण 59 सामने झाले आहेत.
कोहली या 59 सामन्यांपैकी 31 सामन्यांना मुकला आहे. कर्णधार रोहित 25 सामने खेळू शकला नाही. टी-20 बाबत बोलायचे तर कोहली 35 पैकी 21 सामने खेळलेला नाही. लोकेश राहुल 23 सामन्यांना मुकला आहे. तर रोहितने 9 सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
सूर्यकुमार यादव 35 पैकी 26 सामने खेळला. हार्दिक पंड्याने केवळ 19 सामने खेळले. दिनेश कार्तिक 11 तर, अक्सर पटेल 15 सामने खेळला. गेल्या वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराहने अवघे 5 टी-20 तर एकूण केवळ 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जडेजा 9 टी-20 तर एकूण 16 सामने खेळला आहे.
आयपीएलचे चित्र आश्चर्यजनक
रोहित व बुमराह यांनी गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून सलग 14 सामने खेळले आहेत. कोहली, राहुल, जडेजा, चहर, शमी यांनीही आयपीएल स्पर्धेचा संपूर्ण मोसम खेळला. जडेजाला दुखापत झाल्यामुळे गेल्या मोसमात तो काही सामन्यांना मुकला होता मात्र, ते प्रमाण नगण्य ठरत आहे. म्हणजेच आयपीएल स्पर्धेसाठी हे खेळाडू पूर्ण फिट ठरतात तर, आंतरराष्ट्रीय सामन्यांतून विविध कारणांनी माघारही घेतात. आता खेळाडूंच्या याच भूमिकेवर सध्या प्रचंड टीका सुरु आहे.
राजपूत यांचेही ताशेरे
भारताचे माजी कसोटीपटू व मुंबईचे क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनीही भारतीय खेळाडूंच्या या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. आयपीएल स्पर्धेला जास्त महत्त्व दिले जात असल्यामुळेच हे घडते असे थेट भाष्य त्यांनी केले आहे. खेळाडूंनी आधी देशाकडून खेळण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.