गंगा पाणीवाटपावर उभय देशांची चर्चा
नवी दिल्ली, दि. 29 – गंगा पाणी वाटपाची चर्चा करण्यासाठी भारत आणि बांगलादेश या उभय देशांची मंत्रिपातळीवरील बोलणी सहा डिसेंबरपासून सुरू होईल, असे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. दोन्ही देशांशी बोलणी करून वाटाघाटीची तारीख ठरविण्यात आली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामधील वादग्रस्त प्रश्न वाटाघाटीने सोडवावीत अशी भूमिका भारताने प्रथमपासूनच घेतली आहे. भारताच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की या वाटाघाटीत भारत प्रामाणिकपणाने आणि सद्भाव बाळगून भाग घेईल व तोडगा शोधून काढण्याचा प्रयत्न करील.
शेती उत्पन्नावरील कराचा विचार चालू
नागपूर – शेतजमीन व शेतीच्या उत्पन्नावर कर लागू करण्याच्या राज समितीच्या शिफारशींवर सरकार अजून विचार करीत आहे, असे महसूल खात्याचे राज्यमंत्री संग्राम माकणोकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचे वेळी सांगितले.
राज समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आला होता असे सांगून ते म्हणाले, त्या गटाने आपला अहवाल सादर केला असून सरकार त्यावर विचार करीत आहे. हा प्रश्न गुंतागुंतीचा असल्याने निर्णय घेण्यास विलंब लागत आहे. या शिफारसींची अंमलबजावणी केल्यास त्याचा शेतकरी व महसूल प्रशासनाच्या कनिष्ठ स्तरावर दीर्घ पल्ल्याचा परिणाम होईल.