शेजाऱ्यांबाबत कोणताही प्रश्न शिल्लक राहू नये
जवाहरनगर, दि. 22 – आपल्या कोणत्याही शेजाऱ्याबाबत कोणताही प्रश्न शिल्लक उरू नये, असे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी येथे जाहीर केले. चव्हाण यांना बांगलादेश, पाकिस्तान, चीन व श्रीलंका यांच्या बरोबर भारताचे संबंध कसे आहेत त्याचा आढावा घेऊन सांगितले, की सध्या श्रीलंकेच्या बाबतीत कोणताही मोठा प्रश्न नाही ही समाधानाची गोष्ट आहे.
पाकिस्तानबरोबर 11-12 वर्षांत अजिबात संबंध नव्हते. आता हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, टपाल दळणवळण सुरू झाले आहे. हे संबंध सर्वच क्षेत्रात प्रस्थापित व्हावेत.
आसामात तेल मिळाले
जवाहरनगर – आसाममध्ये दामुलगाव येथे तेल मिळाले असल्याचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अ. भा. कॉं. समितीच्या अधिवेशनात आज संध्याकाळी जाहीर केले. नागालॅंडमध्ये बोरहोली येथेही तेल मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात कॉलराची अधिकृत लागण नाही
पुणे – पुणे शहर व परिसरात गेल्या 10-12 दिवसांत कॉलराची एकही अधिकृत लागण झालेली नाही. 28 डॉक्टरांच्या एका पथकाने लस टोचण्याची जोरदार मोहीम हाती घेतली असून आज साडेचार हजार लोकांना लस टोचण्यात आली. लोकांनी केवळ नळाचेच पाणी प्यावे. शहरात 1200 हॉटेल्स असून तेथील पाणी तपासून घ्यावे.