झोपडपट्टीतील लोकही सन्माननीय नागरिक
सोलापूर, दि. 30 – झोपडपट्टीत राहणारे लोक हेही या देशाचे सन्माननीय नागरिक असून शहरातील सर्व नागरिकांप्रमाणेच त्यांनाही सुखसोयींची समान संधी मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे,
असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी येथील कोनापुरे चाळ झोपडपट्टी भागात भाषण करताना काढले. महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा मंडळातर्फे सोलापूर नगरपालिकेने कोनापुरे चाळ झोपडपट्टी विभागात ज्या आवश्यक सुखसोयी केल्या त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.
स्वागताध्यक्ष साहित्यिकच हवा, असा नियम नाही
पुणे – साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचेच असते असे नसून साहित्यिक व साहित्यप्रेमी जनतेचा तो वार्षिक मेळावा असतो, अशी परंपरा आहे. त्यामुळे संमेलनाच्या नियमात स्वागताध्यक्ष हा साहित्यिकच असावा, असा कुठेही निर्देश नाही,
असा खुलासा मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह श्री. ज. जोशी यांनी केला. आजवरच्या स्वागताध्यक्षांच्या नामावलीत साहित्यिक व्यक्ती मोजक्याच आहेत असे आढळून येईल, असेही जोशी म्हणाले. यंदा पुण्यात साहित्य संमेलन भरणार आहे.