– अरुण गोखले
रणरणतं ऊन, घामाच्या धारा, तनामनाचा थकवा, अंगाची होणारी लाही लाही… पाण्याच्या थेंबाचं मोल काय असतं ते सांगणारी ही एक गोष्ट…
रणरणत्या आगीपेक्षाही आणखी एक फार मोठी आग आहे, ती आग आहे पोटाची. त्या आगीपायीच ते तिघे प्रवासीही असेच कामधंद्याच्या, पोटापाण्याच्या सोयीसाठी… पायपीट करत-करत त्या तसल्या उन्हात एका गावाहून दुसऱ्या गावाला चालले होते. डोक्यावरचं कडक ऊन, पायाखालची तापलेली माती, तहानेनं त्या तिघांच्याही घशाला कोरड पडली होती. जीव कासावीस झाला होता.
त्यांना प्यायला पाणी हवं होतं… तोच त्यांना एक झोपडी दिसली. झोपडीच्या दारातच थोडीशी सावली करून, तिथं चांगले दोन-तीन पाण्याचे रांजण भरून ठेवलेले होते. ते तिघं पुढे आले अन् त्यांना पाहून त्या झोपडीमधून एका म्हातारा माणूस बाहेर आला. “”या बाबांनो! या… तहानलात ना. या बसा. जरा विश्रांती घ्या. पाणी प्या. सावलीला टेका अन् मग खुशाल जा तुमच्या प्रवासाला…”
त्या म्हाताऱ्याच्या प्रेमळ स्वागतानं अन् त्यानं मोठ्या आदरानं पाजलेल्या थंडगार पाण्यानं ते तिघंही जीव सुखावले. त्यांची तहान भागली. जीवाला कसं हायसं वाटलं. त्याच पाण्याचे चार गार थेंब अंगावर शिंपडताच शरीरालाही नवचैतन्य आलं. बरं झालं! या बाबांनी ही पाणपोई चालवून आपली तहान भागवली ते, असं म्हणत त्या प्रवाशांनी आपल्या खिशात हात घालत विचारलं, “”बाबा… किती पैसे द्यायचे?”
ते शब्द ऐकले अन् तो म्हातारा म्हणाला, “”बाबांनो! अरे ही पाणपोई आहे. इथं तहानलेल्या जीवांना पाणी पाजून त्याचा जीव शांत करायचा असतो. पाणी हे जीवाचं जीवन आहे. ते दान करायचं असतं. अन् बाबांनो दानाची कधी किंमत करायची नसते. बाबांनो! मला काही नको. माझ्याकडे धन नाही हे खरे. पण माझ्या झोपडीमागच्या विहिरीत एक जिवंत झरा आहे.
जोवर मी पाण्याचा सौदा न करता त्याचं दान करत राहीन तोवर तो झरा अखंड राहणार आहे. माझ्या वाडवडिलांना त्या जलदेवतेनं तसा आशीर्वादच दिला आहे. म्हणूनच मी कोणतंही, कसलंही मोल न घेता हे देवाघरचं अमृत साऱ्या तहानलेल्या जीवांना मोफत पाजतो. त्यांचा जीव शांत करतो. मला पैसा नको, तुमच्या सुखात, आनंदात, तहानेच्या तृप्तीतच माझा आनंद आहे. या बाबांनो! या…”