ठोसेघर – जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलोत्सवाच्या यंदाच्या हंगामाचा 3 सप्टेंबरपासून शुभारंभ होणार आहे. सध्या पठारावरील दुर्मिळ विविध जातीची व रंगीबेरंगी फुले बहरण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही दिवस पर्यटकांना ऑफलाइन प्रवेश देण्यात येणार आहे.
कास परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत. त्यामुळे फुले उमलण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पठारावर रानहळद, पाचगणी, पांढऱ्या रंगाची पंद, सोनकी, आमरी, तेरडा, गेंद, टुथब्रश आदी विविध जात प्रजातींच्या फुलांच्या कळ्या दिसू लागल्या आहेत. ऊन पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर आगामी आठवडाभरात पठारावर फुलांना मोठ्या प्रमाणावर बहर येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. पर्यटन हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कास पठार कार्यकारी समितीने कंबर कसली आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबर रोजी हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पठारावर 120 हून अधिक सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली आहे.
पूर्वीच्या लोखंडी संरक्षक जाळ्या काढल्यानंतर अतिउत्साही पर्यटकांचा फुलांच्या क्षेत्रातील प्रवेश टाळण्याकरता तंगुसच्या संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सध्या समितीच्यावतीने पठारावरील मंडप गुहा, भदार तळं, कास तलाव, व्ह्यू पॉईट या ठिकाणी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे. कास परिसरात सध्या रिमझिम पाऊस, ऊन पावसाचा लंपडाव तर मधूनच पसरणारी धुक्यांची चादर अन् अंगाला झोंबणारा गार वारा असे आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला यंदाच्या फुलोत्सवाच्या हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती पर्यटन हंगामादरम्यान पर्यटकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्याकरिता कामाला लागली आहे. यावेळी प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून प्रतिव्यक्ती 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर वाहन पार्किंग व बस शुल्कात कपात करण्यात आली आहे.
दत्ता किर्दत, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती