अतिवृष्टीने बाधित शेतीचे सर्वेक्षण सुरू ; जनावरांसाठी मदत जाहीर
सातारा – सातारा जिल्ह्यात 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 38 हजार 225 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक सुनील बोरकर यांनी दिली.
अतिवृष्टीच्या पुराने आजू बाजूच्या शेतपिकांचे तसेच पाणी शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू असून येत्या चार ते पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.
शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, सातारा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावातील बाधित झालेल्या लहान व मोठ्या जनावरांना तसेच जनवारांचा गोठा, कोंबड्या इत्यादीसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी दिली.
मदतीमध्ये एका लाभार्थीसाठी जास्तीत जास्त तीन दुधाळ जनावरांसाठी रु. 30 हजार, शेळ्या व मेंढ्यांसाठी 30 हजार, शेतीकाम करणाऱ्या जनावरांसाठी 25 हजार, प्रती कोंबडी रु. 50 रुपये आणि जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली असेल तर रु. 21 हजार इतकी मदत देण्यात येणार आहे.