कराड – कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने मारामारी करून, दहशत पसरवणारी सात जणांची टोळी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आली आहे. टोळीप्रमुख शुभम शंकर काकडे (वय 24, रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर ऊर्फ सॅम नूरमोहम्मद मोमीन (वय 29, मुजावर कॉलनी, कराड), विजय बिरू पुजारी (वय 23, यशवंतनगर, मलकापूर), अल्फाज कासीम शेख (वय 24, मोरया कॉलनी, मलकापूर), अकीब लियाकत पठाण (वय 24, मलकापूर), प्रसाद ऊर्फ बंटी अशोक गाडे (वय 31, औदुंबर कॉलनी, मलकापूर) आणि अक्षय दिलीप धुमाळ (वय 29, तुळजाईनगर, मलकापूर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीवर खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा आणि सांगली जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. टी. पाटील यांनी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावावर समीर शेख यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर या टोळीविरुद्ध हद्दपारीचा आदेश शेख यांनी पारीत केला. या कामी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, कराड तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांनी पुरावे सादर केले.